शुक्रवार, जून १२, २००९

आयला, पावसाला कुठे नेला?

हा प्रश्न हवामान खात्याला उद्देशून नसून, पश्चिम बंगाल मधे आलेल्या "आयला" नामक चक्रीवादळाला आहे. हवामान खात्याच्या बातमीनुसार, ह्या चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टी वरच्या पावसाळी हवेचीच हवा गुल केली आहे. भारताच्या पूर्व किनार्‍यावर जर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तर पश्चिम किनार्‍यावरच्या मानसूनची प्रगती देशाच्या अंतर्गत भागात होते. पण "आयला" मुळे असा पट्टा तयार न झाल्यामुळे, पश्चिमी मानसूनची प्रगती जणू काही थांबलीच आहे. म्हणजे झालं असं की आयलामुळे पूर्व किनार्‍यावरचं तपमान कमी झालं. कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी उच्च तपमान आणि शुष्क वातावरण लागतं. चक्रीवादळामुळे तपमानही खाली आलं आणि आर्द्रता सुद्धा वाढली. आता पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी थोडा काळ जावा लागेल. त्याशिवाय पश्चिमेकडचा मानसून पुढे सरकणार नाही.

सध्या मानसून रत्नागिरीच्या किनार्‍यावर अडकून पडलाय. त्याला तिकडून पुढे सरकायला अजून एक आठवडा तरी लागेल. कारण साधारणपणे एका आठवड्यानंतर पूर्व किनार्‍यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिमी मानसून पुढे सरकेल. हवामान खात्यानुसार आता मुंबईत मानसून जुलई मधेच येईल. म्हणजे अख्खा जून महीना कोरडाच रहाणार.
आयला, पावसाला कुठे नेला?SocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: