सोमवार, सप्टेंबर २०, २०१०

राशीचक्राचे परचक्र

ज्योतिषातल्या बारा राशी. प्रत्येक राशीचे काहीतरी वैशिष्ट्य. काही गमतीदार, काही गंभीर. ही सगळी राशींची आणि त्या राशीत जन्माला आलेल्या लोकांची गम्मत-जम्मत आपल्या समोर आणली राशीचक्रकार शरद उपाध्ये ह्यांनी. गेली अनेक वर्ष चालू असलेलं त्यांचा राशीचक्र अजूनही प्रयोग झाला तर हाऊसफूल होतं. ह्या लोकप्रियतेचा फायदा घेत, उपाध्येंनी आता टी.व्ही. वर राशीभविष्य बद्दल प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम (मी-मराठी) आणि गमतीदार सासू-सून, सासरे-जावई वर कार्यक्रम (ई. टी.व्ही. मराठी) चालू केले. हे कार्यक्रम तूफान लोकप्रिय आहेत. 

त्यांच्या ई. टी.व्ही वरच्या कार्यक्रमात ते राशीचक्रातील काही गमतीदार किस्से सांगत असतात. म्हणजे कुठल्यातरी राशीचा माणूस अमूक प्रसंगी कसा वागला, तोच दुसर्‍या राशीचा असता तर कसा वागला असता, वगैरे. ई. टी.व्ही.च्या कार्यक्रमात तर, दर वेळेला सासूला सांगतात की तुमची सून अमक्या राशीची आहे म्हणून तिने असं उत्तर दिलं. ती ह्या राशीची असती तर तुमच्या मना सारखं/विरुद्ध उत्तर दिलं असतं, वगैरे. ह्या कार्यक्रमाचे अनेक भाग बघून, सहाजिकच जनसामान्यांमधे सून-रास-नक्षत्र असं त्रैराशिक निर्माण होतं. उदाहरणार्थ, अनेक भागां मधे, उपाध्येंनी वृश्चिक राशी आणि विशाखा नक्षत्रा वर जन्माला आलेल्या मुलीला सून करू नये, असं सांगितलं आहे. त्यामागची कारणं सुद्धा त्यांनी दिली आहेत. पण, ह्या जोडी खाली जन्माला येणारी प्रत्येक मुलगी तशीच वागेल का? याचं उत्तर हमखास "नाही" असंच आहे.

आमच्या ओळखीतील एक वृश्चिक रास आणि विशाखा नक्षत्रा मधे जन्मलेल्या मुलीचं लग्न ठरताना अनेक विघ्न येत आहेत. त्याचं मुख्य कारण उपाध्येंचा उपदेश. त्यामुळे बरीच लोकं तिची पत्रिका सुद्धा हातात घ्यायला तयार नाहीत!! खरं तर, ही मुलगी अत्यंत हुशार आहे, खासगी क्षेत्रातील एका चांगल्या बॅंकेत नोकरीला आहे, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. पण उपाध्येंच्या शब्दाला ब्रीद वाक्य मानणारे आपल्याकडे बरेच आहेत. पण हा कार्यक्रम गम्मतीचा भाग आहे, त्यातील प्रत्येक शब्द हा त्या विषयावरील शेवटचा शब्द ठरत नाही. हे अनेक लोकांनी अजून लक्षातच घेतलं नाही. थोडक्यात बारीक अक्षरातील "* conditions apply" हे कुणीच वाचलेलं नाही. आता ह्या मुलीच्या बाबतीत उद्भवलेल्या समस्येचं समाधान उपाध्ये देतील का? पत्रिका घेऊन, ती न जुळणे, हा वेगळा भाग आहे. पण लोकांनी ती घ्यायलाच नकार दिला, तर तिच्या लग्न जमायच्या कितीतरी संध्या फुकट गेल्या असतील. राशीचक्रामुळे तिच्या बाबतीत निर्माण झालेलं हे परचक्र कोण दूर करणार?
राशीचक्राचे परचक्रSocialTwist Tell-a-Friend

३ टिप्पण्या:

mynac म्हणाले...

विनय,
एका अतिशय महत्वाच्या विषयास हात घातल्या बद्दल सर्व प्रथम मनःपूर्वक धन्यवाद.माझा सुध्धा उपाध्येंच्या कार्यक्रमावर अजिबात आक्षेप नाही तो रंगतदार माहितीपूर्ण असतो ह्यात शंका नाही पण झालंय काय कि फक्त त्यांचे कार्यक्रम बघून अर्धवट माहिती वर आधारित आताशा ब्राह्मणेतर समजा मध्ये सुध्धा लग्नाचे वेळी पत्रिकेचे खूळ, लोण जे पसरले आहे ते मात्र भीतीदायक नि विचार करायला लावणारे आहे.अहो ह्या नादा मुळे ३०-३० वर्षापर्यंत मुला मुलींची लग्नच होत नाहीत.खरेतर २२ किंवा जास्तीत जास्त २३ वर्षा पर्यंतच्या स्त्रीला आपण मुलगी म्हणू शकतो नि २५ वर्षा पर्यंतच्या पुरुषास मुलगा.त्या मुळे तिशी बत्तीशी,पस्तिशीच्या च्या बाब्यांना नि बायांना केवळ नाईलाज म्हणून किंवा केवळ रिवाज नुसार मुलगा मुलगी म्हणताना फार लाज वाटते. कोणी काही बघो न बघो,म्हणो न म्हणो,मुळात लग्न हा काहीही झालं तरी थोडा फार जुगार असतोच जो तुम्ही तुमच्या आयुष्याशी खेळत असता,खेळावा लागतो नि ती तुम्ही स्वतःशी नि तुमच्या आयुष्याशी केलेली तडजोड असते हे जर मुळात समजून घेऊन मान्य केले नि त्या दृष्टीने विचार केला तर बरेचसे प्रश्न सुटतील नव्हे निकालात निघतील असा विश्वास वाटतो.अरे भविष्य घडवायच्या दिवसात नुसते हात नि कागद काय बघत नि दाखवत बसलात?.एक गाईड लाईन म्हणून फक्त बघाना.

Vinay म्हणाले...

mynac,
तुमची टिप्पणी जरी मला बर्‍या पैकी पटत असली, तरी काही गोष्टींना आक्षेप आहे.

१. तुम्ही म्हणता की "ब्राम्हणेतर समाजामधे सुद्धा लग्नाच्या वेळी पत्रिकेचे खूळ, लोण पसरले आहे". मी पण जातीने ब्राम्हण आहे, पत्रिकेवर विश्वास असला तरी त्या बरोबर स्वत:चं कर्तृत्व सुद्धा हवं, ह्याची मला तरी जाणीव आहे.

२. आपल्याला काही कळत नाही, म्हणून ज्योतिष शास्त्राला नाव ठेवण्यात काहीही अर्थ नाही.

३. माझा आक्षेप केवळ ह्या गोष्टीला आहे, की कुठल्याही व्यक्तिबद्दल एक "जनरलाईस्ड" मत बनवू नये. व्यक्ति तितक्या प्रकृति, ही म्हण माहित असताना, उगीच उपाध्येंनी केलेल्या स्टेटमेन्टला काळ्या दगडावरची रेख मानण्यात अर्थ आहे का?

पत्रिकेवर विश्वास कितपत ठेवावा, ह्यावर मी मत देणार नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, पत्रिका न बघता केवळ एखाद्या राशीची आणि नक्षत्राची मुलगी/मुलगा नाकारणे चुकीचे वाटते.

Panchtarankit म्हणाले...

योग्य विषयाला हात घातला आहे.
त्या उपाध्यांना सांगा आता जमवा लग्न त्या मुलीचे.
पण समाजात खरेच त्यांचा एवढा प्रभाव आहे ?
मी हा कार्यक्रम करमणूक म्हणून पाहतो.
माझी बायको जर्मन असल्याने मला पत्रिका पाहण्याची वेळच नाही आली.