शनिवार, ऑक्टोबर २७, २०१२

अपूर्व हेमंत

 पु. ल. देशपांडेंच अपूर्वाई वाचलं होतं. त्यात त्यांनी जपान मधील हेमंत ऋतूचं कौतुक केलं होतं. हेमंतातील झाडा-फुलांचे ते निरनिराळे रंग, आल्हाददायक वातावरण इ. खरंच बघत बसण्यासारखे आहे. आणि हा ऋतू संपू नये असं वाटत रहातं. आणि पु.लंनी त्यात लिहीलं सुद्धा आहे, की खरतर हेमंतापेक्षा वसंताचे अधिक कौतुक होत असले तरीही हेमंताची मजा काही औरच आहे. आणि खरच आहे, बघा वसंता मध्ये किती उत्सव होत असतात. वसंत व्याख्यान माला, अनेक संगीत उत्सव, वगैरे. पण हेमंता मध्ये असे उत्सव होताना पाहिले आहेत का?

खरेतर हेमंत चाहूल घेऊन येतो ते येणाऱ्या शिशिराची. म्हणजेच गोठून टाकणाऱ्या काळाची. पान गळती, बोचरे वारे, भर दुपारीसुद्धा उन्हाची ऊब नसते (अर्थात, भारतात बहुतांश ठिकाणी शिशिर ऋतुच सहन करण्यासारखा असतो). म्हणजेच काय, तर एका निर्जीव अवस्थेची नांदी होत असते. म्हणूनच कदाचित हेमंताचे तेवढे कौतुक होत नसावे. समोर निर्जीव अवस्था दिसत असताना, कौतुक कोण करेल?

वसंताचं तसं नसतं. वसंत म्हणजेच एका नव्या पर्वाची सुरवात असते. नवीन उमलेल्या कळ्या, झाडांना नवीन पानं यायला सुरु झालेली असतात. निर्जीवते कडून सजीवते कडे  जाणारा काळ  म्हणजेच वसंत. आणि म्हणूनच त्याचे कौतुक. ते ही योग्यच आहे म्हणा. फिनिक्स पक्ष्या सारखा स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्मास येण्याची करामत वसंतातच दिसते.

पण म्हणून हेमंताचे सौंदर्य काही कमी होत नाही. उलटपक्षी हेमंतातच सृष्टीची उलथापालथ दिसून येते. झाडांवरील पानांचे विविध रंग, हवेतील आल्हाददायक बदल, इ. केवळ हेमंताची वैशिष्ट्ये. जणू सृष्टीचा एक संदेश. बाबांनो, जरीही पुढे एक गोठवून टाकणारा, निर्जीव वाटणारा काळ येणार असेल, तरीही माझे सौंदर्य बघण्यासारखे आहे. ग्रीष्म आणि वर्षा ऋतूत हिरवीगार दिसणारी झाडं एवढी लोभस वाटत नाहीत, जेवढी हेमंतात वाटतात. एके काळी केवळ हिरव्या रंगांच्या अनेक छटांनी भरलेली झाडांची पानं हेमंत येताच विविध रंग धारण करतात. एकाच झाडावर हिरवी, पिवळी, लाल, शेंदूरी, इ. अनेक रंगांची पानं एकाच वेळेस पहायला मिळतात.
 त्यामुळेच कदाचित हेमंतामध्ये एक चैतन्य निर्माण करायची शक्ती आहे. ते चैतन्य अल्प काळासाठी असले तरीही. शेवट समोर दिसत असला ना, की एक अंतिम झुंज द्यायची अद्भुत शक्ती सर्वांच्यात असते. इतिहासात अश्या अंतिम झुंजाच्या अनेक घटना गाजलेल्या आहेत. आणि अश्याच घटना चैतन्य निर्माण करण्यासाठी वापरल्या जातात. बघा ना, "चमक उठी सन सत्तावन में  वह  तलवार पुरानी  थी, खूब लडी  मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी" ही कविता ऐकल्यावर अंगात  अचानक चैतन्य संचारल्या सारखं होतं. अगदी देवा समोर लावलेला दिवा सुद्धा शांत व्हायच्या आधी सर्वात प्रखर प्रकाश देतो. म्हणूनच शोले मध्ये बसंती सुद्धा वीरूला वाचविण्यासाठी, ``जब तक है जान, जान-ए-जहां मै नाचूंगी`` असं गाऊन असलेल्या शक्ती पलीकडे नाचू शकते. येणाऱ्या शिशिरासाठी सृष्टी सुद्धा ``आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम-राम घ्यावा`` असं अगदी थाटात म्हणते.
अपूर्व हेमंत SocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: