शनिवार, जून २६, २०१०

मुंबई: सुधारित रिक्षा भाडं

सी.एन.जी. ची किंमत वाढवल्यानंतर टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्यां मधे वाढ होणार, हे निश्चित होतं. प्रवासी आणि रिक्षाचालक-मालक, दोघेही ह्या भाडे वाढीची आतुरतेने वाट बघत होते. सुरवातीला "इलेक्ट्रॉनिक मीटर लावले तरच भाडे वाढीला मान्यता देऊ अन्यथा देणार नाही", असा पवित्रा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला. त्याचं रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रचंड विरोध झाला. इलेक्ट्रॉनिक मीटर सगळ्याच दृष्टीने महाग, खराब होण्याची शक्यता अधिक आणि ते टॅम्पर प्रूफ सुद्धा नाहीत, ह्या अनेक बहाण्यांचा वापर केला गेला. त्यामुळे, भाडेवाढ करताना ह्या अटीचा कार्यालयाला विसर पडला.

आता प्रत्यक्ष भाडेवाढी कडे वळूया. ती किती असावी ह्यावर मी माझं मत मांडत नाही. पण ती असताना प्रवाश्यांचे हाल होऊ नयेत एवढीच अपेक्षा. रिक्षाचे किमान भाडे, रु. ९ वरून रु. ११ करण्यात आले आहे. आणि त्यापुढे प्रत्येक कि.मी. ला आकारले जाणारे भाडे रु. ५ वरून रु. ६.५० करण्यात आले आहे. ह्यात सगळ्यात डोकेदुखीची बाब ठरणार ती त्या वरच्या ५० पैश्यांची. रिक्षावाले नेहमीच सांगणार ५० पै. नाहीत. मग प्रवाश्याने हताशपणे त्या वरच्या ५० पैश्यांवर पाणी सोडायचे. कारण स्वत: रिक्षावाले काही सोडणार नाहीत.

सध्या ५० पै. फार कमी ठिकाणी चलनात आहेत. मुंबईत तर हल्ली दुकानांनी आठ-आण्याचं नाणं स्वीकारणं बंद केलं आहे. ह्या परिस्थितीत ५० पैश्यांची नाणी आणायची कुठून? कारण अनेक लोकांनी आपापली नाणी बॅंकेतून बदलून घेतली असतील अथवा कुठेतरी खपवली असतील. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे होती. भाडे वाढ कमी ठेवण्याच्या नादात प्रवाश्यांचे कष्ट आणि ताप वाढले आहेत.
मुंबई: सुधारित रिक्षा भाडंSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, जून १६, २०१०

दृष्टी पलीकडील रंग सृष्टी

माझी रंगां बद्दलची समज खूपच साधी आहे. इंद्रधनुष्यात दिसतात ते सात रंग आणि अजून थोडेफार, उदाहरणार्थ, गुलाबी, चॉकलेटी, काळा, राखाडी, खाखी, एवढच. ह्या पलीकडे रंग असले, तर मी त्यांना इंद्रधनुष्यातल्या एका रंगाच्या चओकटीत बसवतो. म्हणजे नेव्ही ब्लू हा माझ्या साठी निळाच रंग आहे. किंवा "लेमन ग्रीन" ला मी इतर हिरव्या रंगां पेक्षा फार वेगळं करू शकत नाही. त्यामुळे कपडे घेताना आपल्याला फार विचार करावा लागत नाही.

पण, माझी आई, तिच्या मैत्रिणी, बहिणी, मावश्या, आत्या, आणि बहुतांश स्त्रियांना नजरे पलीकडचे अनेक रंग दिसतात. त्यांना ते रंग दाखवणारे साडीच्या (आणि हल्ली ड्रेसच्या) दुकानातील मदतनीस बहुदा डोळ्यांवर वेगळी कॉन्टॅक्ट लेंस लावून येत असावेत. आता राणी कलर म्हणजे काय? हे मला अजूनही कळलेलं नाही. उभ्या जन्मात कळेल, असं वाटत नाही. बरं तो रंग नेहमीच राणी "कलर" असतो. तो क्वीन्स रंग किंवा राणी-रंग नसतो. अगदी इंग्रजीचा गंध नसलेले सुद्धा (हल्ली असे कुणी सापडणं कठीण आहे म्हणा) त्या रंगाला राणी कलरच म्हणतात.

तीच गत रामा-ग्रीनची. ह्या रंगाचं सोवळं सर्वात पहिल्यांदा रामाने नेसलं होतं का? की ह्या रंगाची साडी-चोळी सीतेला त्याने भेट म्हणून दिली होती का? ह्याचं उत्तर सापडणं कठीण आहे. कुठल्या तरी रंग बनवण्याच्या कारखाण्यात काम करण्यार्‍या रामा गड्याने रसायनांचं प्रमाण चुकवलं असेल आणि त्यातून निर्माण झालेला हा रामा-ग्रीन.

असो, नजरे पलीकडच्या विश्वात असे अजून अनेक रंग असतील. दिसतं तसं नसतं, म्हणतात ते हेच. रामा ग्रीन रंगावर थोडी निळ्या रंगाची झाक पण आहे. राणी कलर मधे कुठल्या रंगांचं मिश्रण असेल, माहित नाही. दृष्टी आडची ही सृष्टी कळण्यास बहुदा दुसरा जन्म उजाडेल.
दृष्टी पलीकडील रंग सृष्टीSocialTwist Tell-a-Friend

रविवार, जून ०६, २०१०

गोमंतक लॉजिंग-बोर्डिंग हॉटेल

आज परळला गेलो होतो, तेव्हा येताना मत्स्याहार करायचं ठरवलं होतं. ३-४ महिन्यांपुर्वी मालवणला गेलेलो असताना, तिकडे हॉटेल चैतन्य मधे जेवायचा योग आला होता. तेथील जेवण अतिशय उत्कृष्ट होतं. त्या वेळेस वाटलं होतं की असं जेवण मुंबईत किंवा पुण्यात मिळेल का? तोच त्या चैतन्यवाल्याने आपलं कार्ड दिलं ज्यात त्यांच्या मुंबईच्या शाखेचा पत्ता होता. मुंबईत हॉटेल चैतन्य राम गणेश गडकरी चौकात आहे. ठाकूर कटपीसच्या समोर. पण दुर्दैव असं की ते फक्त घरी घेऊन जाण्यास डबे देतात. तिकडे बसून जेवायची सोय नाही!! आणि हे त्यांच्या कार्डावर दिलं नसल्याने, तिकडे जाईस तोवर ह्याची कल्पना नव्हती. आता झाली का पंचाईत? जेवण बांधून येथे पवईला येई पर्यंत ते पूर्णपणे थंडं झालं असतं आणि थंडं मासा काय खायची इच्छा नव्हती. मग वाटलं की आजचा बेत काही पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही पुन्हा दादर स्टेशनच्या दिशेने वळलो.

तोच कोहिनूर मिलला लागून असलेल्या पदपथावरून दादर स्टेशनच्या दिशेने जाताना हॉटेल गोमान्तक लॉजिंग-बोर्डिंग दिसलं. ते पाहिल्यावर म्हण्टलं की आज आपल्या नशीबात मत्स्याहार आहेच. असा विचार करून आत शिरलो. जागा पण लगेच मिळाली. पहिल्यांदाच आलेलो असल्याने, काय मागवायचे हे कळत नव्हते. म्हणजे इथला चांगला पदार्थ कुठला, अथवा ह्या हॉटेलची खासियत काय, हे काहीच माहित नव्हतं. अशा वेळेला, आई-बाबांचा हुकूमी एक्का वापरला. थाळी मागवली!! विचारलं, पापलेट थाळी आहे का? वेटर हो म्हणाला. मग काय, पापलेट थाळीची ऑर्डर दिली. आणि ऑर्डर देते वेळेस लक्षात होतं की कोकणात चपात्यांपेक्षा "वडे" केव्हाही चांगले. म्हणून त्याला सांगितलं की थाळी मधे चपाती नको, वडे दे.

हॉटेल मधली सेवा तत्पर आहे. खाद्यपदार्थांचे दर सुद्धा वाजवी आहेत. एवढ्या मोक्याच्या ठिकाणी असून देखील दर सर्वसामान्यांना परवडण्याजोगे आहेत. फक्त आतील विद्युत रोशणाई जरा सुधारली तर बरं होईल. वेटर सुद्धा संध्याकाळी नऊ वाजता प्रसन्न चेहर्‍याने वावरत होते. माश्याची थाळी, वड्यां सकट, १५ मिनिटात आली!! ४ वडे, एक मध्यम आकारचं पापलेट, कालवण, कांदा-लिंबू, सोल-कढी आणि भात. मी पण जोरात ताव मारला. भूक तर लागलीच होती. पापलेट चवीला चांगलं होतं. मुळात मासा चांगला होता. सोल-कढी सुद्धा चांगली होती. आणि मुख्य म्हणजे हे सगळं वट्ट ११८ रुपयात.

एवढं जेवल्यावर दादर स्टेशनला आलो. लाजरी शेजारच्या पानाच्या टपरीवर पान खाल्लं. आणि फलाटावर येऊन कुल्फी खाल्ली. तेवढ्यात ठाणे लोकल आली. ती रिकामी पाहून चटकन त्यात उडी मारून घरच्या प्रवासाला लागलो.

गोमंतक लॉजिंग-बोर्डिंग हॉटेलSocialTwist Tell-a-Friend