शनिवार, जून २६, २०१०

मुंबई: सुधारित रिक्षा भाडं

सी.एन.जी. ची किंमत वाढवल्यानंतर टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्यां मधे वाढ होणार, हे निश्चित होतं. प्रवासी आणि रिक्षाचालक-मालक, दोघेही ह्या भाडे वाढीची आतुरतेने वाट बघत होते. सुरवातीला "इलेक्ट्रॉनिक मीटर लावले तरच भाडे वाढीला मान्यता देऊ अन्यथा देणार नाही", असा पवित्रा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला. त्याचं रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रचंड विरोध झाला. इलेक्ट्रॉनिक मीटर सगळ्याच दृष्टीने महाग, खराब होण्याची शक्यता अधिक आणि ते टॅम्पर प्रूफ सुद्धा नाहीत, ह्या अनेक बहाण्यांचा वापर केला गेला. त्यामुळे, भाडेवाढ करताना ह्या अटीचा कार्यालयाला विसर पडला.

आता प्रत्यक्ष भाडेवाढी कडे वळूया. ती किती असावी ह्यावर मी माझं मत मांडत नाही. पण ती असताना प्रवाश्यांचे हाल होऊ नयेत एवढीच अपेक्षा. रिक्षाचे किमान भाडे, रु. ९ वरून रु. ११ करण्यात आले आहे. आणि त्यापुढे प्रत्येक कि.मी. ला आकारले जाणारे भाडे रु. ५ वरून रु. ६.५० करण्यात आले आहे. ह्यात सगळ्यात डोकेदुखीची बाब ठरणार ती त्या वरच्या ५० पैश्यांची. रिक्षावाले नेहमीच सांगणार ५० पै. नाहीत. मग प्रवाश्याने हताशपणे त्या वरच्या ५० पैश्यांवर पाणी सोडायचे. कारण स्वत: रिक्षावाले काही सोडणार नाहीत.

सध्या ५० पै. फार कमी ठिकाणी चलनात आहेत. मुंबईत तर हल्ली दुकानांनी आठ-आण्याचं नाणं स्वीकारणं बंद केलं आहे. ह्या परिस्थितीत ५० पैश्यांची नाणी आणायची कुठून? कारण अनेक लोकांनी आपापली नाणी बॅंकेतून बदलून घेतली असतील अथवा कुठेतरी खपवली असतील. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे होती. भाडे वाढ कमी ठेवण्याच्या नादात प्रवाश्यांचे कष्ट आणि ताप वाढले आहेत.
मुंबई: सुधारित रिक्षा भाडंSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: