रविवार, डिसेंबर १९, २०१०

अक्षय पात्र: वदनी कवळ देता

वनवासात असताना पांडवांना अन्न-धान्याची टंचाई भासू नये आणि आलेल्या ऋषी-मुनी आणि अथितींना उपाशी परत पाठवायला लागू नये, म्हणून युधिष्ठिराने सूर्यदेवाकडून अक्षय पात्र मिळवले. ह्या पात्राची ख्याती अशी होती की ह्यातील अन्न कधीच संपत नसे. सगळ्यात शेवटी द्रौपदीने जेवल्यावर ते पात्र घासून ठेवलं की त्यातील अन्न समाप्त होई. ह्या अक्षय पात्रामुळे पांडवांनी अनेक भुकेलेल्या अथितींना जेवण वाढून तृप्त केलं होतं. आलेल्या पांथस्ताची जठराग्नि शमविण्याचे काम ह्या अक्षय पात्राच्या मार्फत होत असे.

आता ते पांडवही गेले आणि ते अक्षय पात्र सुद्धा. पण भारतातील कोट्यावधी लोकांची जठराग्नि अजूनही धगधगत आहे. ह्या जठराग्निला शमविण्याकरिता अनेक लहान मुलांना आपल्या आयुष्यातील कोवळी वर्षं शाळेत न जाता मजूरी मधे घालवावी लागतात. त्यांना शाळेत घातलं, तर त्यांचा पोटात काही घालता येणार नाही, हे भयाण सत्य आहे. भारतातील एक मोठा वर्ग जर अशा कारणांमुळे अशिक्षित राहिला, तर देशाला खरी प्रगती लाभणं कठीण आहे. त्याहीपेक्षा एखादं जीव पैशा अभावी उपाशी रहात आहे, ही गोष्ट सुद्धा अन्यायकारक आहे. मुलांनी शिकावं आणि सुजाण नागरिक व्हावं, ह्या साठी सरकारने अनेक योजना चालू केल्या आहेत. त्यातील सर्वात महत्वाची योजना म्हणजे मध्यान्न अन्न योजना (Mid-day Meal Scheme). ह्या योजने अंतर्गत सरकारी शाळांमधे शाळेत आलेल्या मुलांना दुपारचं जेवण दिलं जाईल. जेवण सकस आणि पौष्टिक असावं, तसचं योग्य प्रमाणात असावं, ह्या साठी सुद्धा सरकारने नियम घालून दिले आहेत.

पण सरकार कडे द्रौपदी सारखं अक्षय पात्र नाहीये. म्हणून सरकारने आपल्या सोबत अनेक स्वयंसेवी संस्थांना सुद्धा ही योजना राबविण्याची परवानगी दिली आहे. द्रौपदीच्या मदतीला जसे भगवान श्रीकृष्ण धावून आले होते, तसच इस्कॉनची अक्षय पात्र योजना सरकारच्या मदतीला आली आहे.

इस्कॉनची अक्षय पात्र योजना ही सरकारच्या मिड-डे मील योजनेपेक्षा जुनी आहे. ह्या योजनेची सुरवात २००० साली बंगलोर मधे पाच शाळांतील १५०० मुलांना जेवण पुरविण्यापासून झाली. पण २००१ साली सरकारची योजना जाहिर झाल्यावर इस्कॉनने आपली अक्षय पात्र योजना ह्या योजनेला जोडली. आज अक्षय पात्र योजने अंतर्गत ९ राज्यांतील १९हून अधिक शहरं, नगर इ. शाळांमधल्या १२.५ लाखहून अधिक मुलांना रोज दुपारचे अन्न पुरविले जाते.

ह्या योजनेची व्याप्ती बघता तुम्हाला कल्पना आली असेलच की अशा योजना चालण्या साठी आर्थिक पाठबळ किती गरजेचं आहे. त्याही पेक्षा जर आपण दान केलेल्या पैशां मधून दोन मुलांना वर्षभरासाठी जेवायला पौष्टिक अन्न मिळत आहे, आणि त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती सुद्धा होत आहे, हे पहाण्यात किती तरी समाधान आहे. द्रौपदीच्या अक्षय पात्राला सूर्यदेवाचा आशिर्वाद होता. सूर्य हा ऊर्जेचा प्रतिक आहे. इस्कॉनच्या अक्षय पात्राला सुद्धा तुमच्या आर्थिक सहाय्याची आणि ऊर्जेची गरज आहे. जमल्यास अर्थ सहाय्य करा, शक्य नसल्या श्रमदान. कुठल्याही प्रकारच्या सहायते स्वागतच केलं जाईल. आर्थिक सहायता करण्यार्‍या इच्छुकांनी येथे क्लिक करावे. २०२० सालापर्यंत ५०लाख मुलांना ह्या योजनेचा लाभ व्हावा हे इस्कॉनचं ध्येय आहे. आपला सर्वांचा हातभार लागला तर हे लक्ष फार दूर नाहीये, असा माझा विश्वास आहे. जाता जाता, हा संदेश बघा

ह्या संदेशाची पूर्ती करण्या मधे मिड-डे मील योजनेचा मोठा हातभार असणार आहे. तर या, आपण सगळे ह्या योजनेला यशस्वी बनविण्यासाठी हातभार लावूया.
अक्षय पात्र: वदनी कवळ देताSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, डिसेंबर ०४, २०१०

थोडंसं २६/११ विषयी

नुकतीच २६/११ च्या घटनेचा दुसरा स्मृतीदिन होऊन गेला. ह्या निमित्ताने अनेक कार्यक्रम, सभा, देशाचं रक्षण आणि अतिरेक्यांचं उच्चाटन करण्याबद्दल भाषणं झाली. पण, सर्वांचा सपेशल राग होता तो अजमल कसाबला अजून फाशी न दिल्या बद्दल आणि अफ़झल गुरूची फाशीची शिक्षा अमलात न आणल्याबद्दल.

पण कसाबला न्याय-प्रक्रियेतून शिक्षा होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्या क्रौर्याच्या विरोधात कोर्टात सादर केलेली चार्जशीट जवळ-जवळ ११,००० पानांची आहे. आता एवढी मोठी चार्जशीट तयार करणे, त्यातील कायदेशीर बारकावे समजून घेणे आणि कुठल्याही पळवाटा राहू नयेत ह्याची खबरदारी घेणे, ह्या कामाला थोडा काळ तर लागणारच ना? आणि ती तशी सादर केल्यावर न्यायाधीशांना सुद्धा ती वाचून त्यातील सगळे मुद्दे कायद्यानुसार सिद्ध केले आहेत ना, हे तपासायला वेळ लागणारच ना. तरीही, ह्या कोर्टाचे कामकाज रोज चालायचे. त्यात कधीही खंड पडला नाही. आता आपला कायदा असा आहे, की सेशन्स कोर्टाने दिलेली फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाचा शिक्का मोर्तब होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कारवाई सुद्धा चालू झाली आहे. आणि ती व्यवस्थित वेगाने चालू आहे. आपलं रक्त उफाळून येतं कारण आपल्याला मीडिया कसाबच्या प्रत्येक हालचाली बद्दल रंगवून सांगत असतं. तो कसा न्यायाधीशांकडे लक्ष देत नव्हता, त्याने जेल मधे आज बिरयाणी मागितली, काल पुस्तकं मागितली वगैरे, वगैरे. पण न्यायाधीशांनी त्याला खडसावले, किंवा जेल अधिकार्‍यांनी त्याच्या मागण्या पुरवल्या की झिडकारुन लावल्या हे मीडिया कधीही सांगत नाही. आपल्याला वाटतं, हा कसला बेशरम आहे, उद्दामपणे वागतो. पण लक्षात घ्या, आपल्याला चिथवण्यातच त्याला आसुरी आनंद आहे. त्याचा कडे गमवण्यासारखे काहीच नाहीये. मग आपल्याला त्रास होत आहे, हे पाहूनच त्याला आनंद होईल. त्यामुळे आपण ह्या बातम्यांवर प्रतिक्रिया न देणे जास्ती सोईचे ठरेल. अर्थात न्यायालयीन प्रक्रिया वेगाने चालू राहण्यासाठी आपण आवाज उठवलाच पाहिजे.

१९९५ साली ओकलोहोमा शहरातील एका इमारतीत प्रचंड मोठा स्फोट घडला होत. ह्या स्फोटात १६८ लोकांचा मृत्यु आणि ६८० च्यावर लोकं जखमी झाले होते. हा स्फोट, टिमोथी मॅकवेह नामक अमेरिकी नागरिकानेच घडवून आणला होता. १९९५ साली घडलेल्या ह्या स्फोटाची न्यायालयीन कारवाई सहा वर्षं चालली आणि २००१ साली त्याला देहदंड सुनावण्यात आला. म्हणजे अमेरिकेतही न्याय्य पद्धतीने शिक्षा सुनावण्यास एवढा वेळ लागला.

दुसरं, लोकं असं ही म्हणतात, की ११ सप्टेंबर २००१ साली झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी अल-कायदा आणि त्यांचे आश्रयदाता तालिबान, ह्यांना शिक्षा करण्यासाठी अमेरिकेने अफगानिस्तान वर युद्ध पुकारले. तसे आपणही पाकिस्तानवर युद्ध पुकारून तिथल्या मुजाहिद्दीन छावण्या नष्ट केल्या पाहिजेत. अमेरिकेने युद्ध पुकारले खरे. हे ही खरं आहे की त्यांनी असं केल्यावर आज पर्यंत त्यांचा धर्तीवर पुन्हा कधीही अतिरेकी हल्ला झाला नाही. पण, नुकसान होण्यासाठी अतिरेक्यांनी हल्ला करावाच लागत नाही. आज, अफगानिस्तान मधील युद्धाची स्थिती त्रिशंकु सारखी आहे. त्या युद्धात केवळ अमेरिकेचे १,०७५ योद्धांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याचप्रमाणे, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इ. देशांचे सुद्धा असेच शेकडोंनी योद्धे मारले गेले आहेत. शिवाय, सगळ्यांचे मिळून १०,००० च्यावर कुठल्या न कुठल्या स्वरुपात जखमी आहेत. अमेरिकेने अब्जावदी डॉलर्स ह्या युद्धात खर्च केले आहेत. इराक मधे तर केवळ अमेरिकेची ५,००० हून अधिक लोकं मृत्युमुखी पडली आहेत. इराक व अफगानिस्तान मधील युद्धामुळे अमेरिकेची आर्थिक परिस्थिती  कशी डबघाईला आलेली आहे हे आपण पहात आहोतच.

आपण जर युद्ध पुकारायचे मनात आणले, तर हजारोंच्या संख्येनी गेलेली प्राणांची आहुति, कोटींच्या पटीत पैशांचा खर्च करून, खरच अतिरेकी कारवाया बंद होणार आहेत का? आज अल कायदाला अमेरिकेचं नुकसान करण्यासाठी अमेरिके पर्यंत जायची सुद्धा गरज नाही उरली. केवळ $४,२०० डॉलर खर्चून त्यांना अमेरिका व युरोप मधील हवाई मालवहातूक अनेक दिवसांसाठी ठप्प करता आली. कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान झाले. ह्यात जरी जीव हानी झाली नाही, तरी भिती निर्माण करून नुकसान करता आलेच आहे.

वरील गोष्टी जर लक्षात घेतल्या, तर युद्ध हा फार फायदेशीर पर्याय वाटत नाही. पाकिस्तानला वेठीस धरून त्यांना ह्या छावण्या बंद पाडायला भाग पाडण्यास अन्य आर्थिक मार्ग आहेत, त्याचा विचार आपण करायला हवा. असे मार्ग अन्य देशांच्या बाबती चीनने अवलंबलेले आहेत. आपण त्यातून बोध घेतला पाहिजे.

तात्पर्य, चालू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला विश्वातील सर्वात जुन्या लोकशाही मधे आणि सर्वात मोठ्या लोकशाही मधे, वेळ लागतोच. पण वेळ लागतो हे कारण, तो मार्ग सोडण्यासाठी होऊ शकत नाही.

तळ टीप १: प्लॅटफॉर्म तिकिट न घेता प्लॅटफॉर्मवर प्रवेश केल्याचा गुन्ह्याचे कलम सुद्धा कसाब विरुद्ध लावण्यात आलेले आहे.

तळ टीप २: माझे विचार तुम्हाला पटतीलच असे नाही. पण, हे एकदा वाचायला आणि ह्यावर विचार करायला हरकत काय आहे?
थोडंसं २६/११ विषयीSocialTwist Tell-a-Friend