बुधवार, नोव्हेंबर २४, २०१०

आम्ही १०५

महाभारतातली गोष्ट आहे. द्यूत क्रीडेत स्वत:चं सगळं गमवल्यावर पांडव आणि द्रौपदी वनवासात आपले आयुष्य कष्टाने काढत होते. त्यांना केवळ द्यूत क्रीडेत हरवून दुर्योधनाला चैन नव्हती. सतत काहीतरी खुरापत काढून पांडवांना सतवता कसं येईल हेच त्याचं ध्येय होतं. म्हणून एकदा तो आपल्या सगळ्या लवाजम्या सोबत पांडव रहात असलेल्या वनात गेला. नेमकं त्याच वनातल्या एका तलावात गंधर्वनरेश आपल्या परिवारा सोबत जलक्रीडेत मग्न होता. दुर्योधनाने त्याला तिकडून जायला सांगितल्यावर  गंधर्वनरेश चिडला आणि त्याने दुर्योधनाच्या सैन्याचा पराभव केला आणि दुर्योधनाला मुसक्या आवळून त्याला बंदी बनवलं. कौरवांपैकी कुणीतरी ही गोष्ट पांडवांना कळवली, तेव्हा युधिष्ठिर सोडून इतर पांडवांना कोण आनंद झाला. "आमची कुरापत काढायला आला होता काय. आता भोग स्वत:च्या कर्माची फळं."  भीम आणि अर्जुन म्हणाले. कौरवांनी दुर्योधनाला सोडून आणण्याची विनंती युधिष्ठिराला केली.

त्यावेळी धर्मराजाने भीम-अर्जुनाला सांगितले "राज्यासाठी आपण आपसात कितीही लढत असलो, ते शंभर आणि आपण पाच असलो, तरी राज्याबाहेरचा शत्रू  आल्यावर आपण एकशे पाच आहोत. हे लक्षात घ्या." आणि असा उपदेश करून भीम आणि अर्जुनाला दुर्योधनाची सुटका करून आणायचा आदेश दिला. या पुढची कथा सर्वांना माहितच आहे, त्यामुळे ती इथे प्रस्तुत करत नाही.

कट टू साल २०१०. देशात वृत्त वाहिन्यांचा सुळसुळाट माजला आहे. बातमी (नामक राज्या)साठी आपापसात ह्यांचं जवळ-जवळ युद्धच चालू असतं. कुठल्याही बातमीचा तुकडा आपल्याला पहिल्यांदा कसा मिळेल, ह्याचीच चढा-ओढ. सुईच्या टोकावर मावेल, एवढीही बातमी त्यांना प्रतिस्पर्ध्यांसाठी सोडायची नसते. त्यातून ह्या वृत्त वाहिन्यांनी अनेक घोटाळे, आणि सरकारी ढिसाळपणा जनते समोर प्रस्तुत केला असल्याने जनतेमधे त्यांचा बद्दल थोडा आदर आहे.

पण ह्याच विश्वासाला एके दिवशी ह्या कौरव-पांडव भाऊ-बंधुंनी सुरुंग लावला. नीरा राडिया नामक कॉरपोरेट लॉबिस्ट बरोबर ह्यांचातील काही सुप्रसिद्ध पत्रकारांचं हितगुज ओपन नामक मासिकाने प्रसिद्ध केलं. ह्या संभाषणां मधे अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडल्या. ज्या वार्ताहरांचं/पत्रकारांचं चारित्र्य हे धर्मराजाच्या रथाप्रमाणे इतरांपेक्षा चार बोटं वर समजत होतो, तेच सत्तेची गणितं बदलण्यात गुंतले होते. द्रोणाचार्यांशी खोटं बोलल्याने युधिष्ठिराचं रथ धरतीच्या चार बोटं वर न राहता, जमीनीवर येऊन आदळले होते. त्याचप्रमाणे, पत्रकार/वार्ताहार हे सुद्धा इतरां पेक्षा फार काही वेगळे नाहीत. राजकारण्यांप्रमाणे ते सुद्धा एवढेच विकाऊ आहेत, हे लक्षात आलं. त्यांना कुठल्या प्रकारची लाच देऊन खुश करता येईल, ह्याचा अंदाज त्या टेप्स वरून करता येईल.
 चैतन्य कुंटे नावाच्या ब्लॉगरने बरखा दत्तच्या वार्ता-गिरी विरुद्ध लिहिलं, म्हणून NDTV आणि बरखा ह्यांनी मिळून त्याच्या विरुद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. पण आता बरखा म्हणते की असे कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा अधिकार कुणालाही नाही. अरे वा रे, तुम्ही वाट्टेल ते करू शकता आणि जरा तुमच्या विरुद्ध कुणी ब्र काढला तर तुम्हाला एवढा राग येतो. बरखाची ट्विटर टाईम लाईन बघितली तर ती म्हणते की आम्ही आमच्या सुत्रां कडून बातमी मिळवत होतो आणि तो आमचा अधिकार आहे. अधिकार असला तरी त्या टेप्स मधला प्रयत्न बातमी मिळवण्याचा न वाटता स्वत:साठी सोयीस्कर बातमी निर्माण करण्याचा वाटतो.

पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे इतर वृत्त माध्यमांनी साधलेली चुप्पी. एरवी कुठल्याही "ब्रेकिंग न्यूज" ची फारशी शहानिशा न करता प्रस्तुत करणारे, आता ह्या टेप्सची शहानिशा केल्यावरच आम्ही भाष्य करू असे बोलायला लागले आहेत. एरवी कुणाच्याही चारित्र्याची पर्वा न करणारे बातमीदार, आता मात्र बरखा, वीर सांघवी, प्रभु चावला ह्यांच्या चारित्र्याची निगा राखण्यात दंग आहेत. बातमीदारच स्वत: मोठी बातमी झाल्यावर,  महाभारतातल्या वरील वर्णन केलेल्या प्रसंगा प्रमाणे, हे वृत्तक्षेत्रातील कौरव-पांडव आता १०५ झाले आहेत.
आम्ही १०५SocialTwist Tell-a-Friend

२ टिप्पण्या:

Pravin म्हणाले...

Very nice post! Plz write a article on it in english and send it to zeenews, aajtak, starnews and english newspapers.

Vinay म्हणाले...

@Pravin,
काही फायदा आहे का? आपल्या मराठी वृत्तमाध्यमांनी सुद्धा दखल घेतली नाहीये. कारण म.टा., लोकसत्ता हे अनुक्रमे Times of India आणि Indian Express ह्या समूहाच्या मालकीचे आहेत. पण सकाळ आणि लोकमत सारख्यांनी सुद्धा चुप्पी साधली आहे. त्यातून ह्या बाबतीतले सगळ्यांचे दृष्टीकोण स्पष्ट जाणवतात. ह्या चुप्पीतूनच त्यांचे विचार बोलत आहेत.