शनिवार, डिसेंबर ०४, २०१०

थोडंसं २६/११ विषयी

नुकतीच २६/११ च्या घटनेचा दुसरा स्मृतीदिन होऊन गेला. ह्या निमित्ताने अनेक कार्यक्रम, सभा, देशाचं रक्षण आणि अतिरेक्यांचं उच्चाटन करण्याबद्दल भाषणं झाली. पण, सर्वांचा सपेशल राग होता तो अजमल कसाबला अजून फाशी न दिल्या बद्दल आणि अफ़झल गुरूची फाशीची शिक्षा अमलात न आणल्याबद्दल.

पण कसाबला न्याय-प्रक्रियेतून शिक्षा होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्या क्रौर्याच्या विरोधात कोर्टात सादर केलेली चार्जशीट जवळ-जवळ ११,००० पानांची आहे. आता एवढी मोठी चार्जशीट तयार करणे, त्यातील कायदेशीर बारकावे समजून घेणे आणि कुठल्याही पळवाटा राहू नयेत ह्याची खबरदारी घेणे, ह्या कामाला थोडा काळ तर लागणारच ना? आणि ती तशी सादर केल्यावर न्यायाधीशांना सुद्धा ती वाचून त्यातील सगळे मुद्दे कायद्यानुसार सिद्ध केले आहेत ना, हे तपासायला वेळ लागणारच ना. तरीही, ह्या कोर्टाचे कामकाज रोज चालायचे. त्यात कधीही खंड पडला नाही. आता आपला कायदा असा आहे, की सेशन्स कोर्टाने दिलेली फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाचा शिक्का मोर्तब होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कारवाई सुद्धा चालू झाली आहे. आणि ती व्यवस्थित वेगाने चालू आहे. आपलं रक्त उफाळून येतं कारण आपल्याला मीडिया कसाबच्या प्रत्येक हालचाली बद्दल रंगवून सांगत असतं. तो कसा न्यायाधीशांकडे लक्ष देत नव्हता, त्याने जेल मधे आज बिरयाणी मागितली, काल पुस्तकं मागितली वगैरे, वगैरे. पण न्यायाधीशांनी त्याला खडसावले, किंवा जेल अधिकार्‍यांनी त्याच्या मागण्या पुरवल्या की झिडकारुन लावल्या हे मीडिया कधीही सांगत नाही. आपल्याला वाटतं, हा कसला बेशरम आहे, उद्दामपणे वागतो. पण लक्षात घ्या, आपल्याला चिथवण्यातच त्याला आसुरी आनंद आहे. त्याचा कडे गमवण्यासारखे काहीच नाहीये. मग आपल्याला त्रास होत आहे, हे पाहूनच त्याला आनंद होईल. त्यामुळे आपण ह्या बातम्यांवर प्रतिक्रिया न देणे जास्ती सोईचे ठरेल. अर्थात न्यायालयीन प्रक्रिया वेगाने चालू राहण्यासाठी आपण आवाज उठवलाच पाहिजे.

१९९५ साली ओकलोहोमा शहरातील एका इमारतीत प्रचंड मोठा स्फोट घडला होत. ह्या स्फोटात १६८ लोकांचा मृत्यु आणि ६८० च्यावर लोकं जखमी झाले होते. हा स्फोट, टिमोथी मॅकवेह नामक अमेरिकी नागरिकानेच घडवून आणला होता. १९९५ साली घडलेल्या ह्या स्फोटाची न्यायालयीन कारवाई सहा वर्षं चालली आणि २००१ साली त्याला देहदंड सुनावण्यात आला. म्हणजे अमेरिकेतही न्याय्य पद्धतीने शिक्षा सुनावण्यास एवढा वेळ लागला.

दुसरं, लोकं असं ही म्हणतात, की ११ सप्टेंबर २००१ साली झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी अल-कायदा आणि त्यांचे आश्रयदाता तालिबान, ह्यांना शिक्षा करण्यासाठी अमेरिकेने अफगानिस्तान वर युद्ध पुकारले. तसे आपणही पाकिस्तानवर युद्ध पुकारून तिथल्या मुजाहिद्दीन छावण्या नष्ट केल्या पाहिजेत. अमेरिकेने युद्ध पुकारले खरे. हे ही खरं आहे की त्यांनी असं केल्यावर आज पर्यंत त्यांचा धर्तीवर पुन्हा कधीही अतिरेकी हल्ला झाला नाही. पण, नुकसान होण्यासाठी अतिरेक्यांनी हल्ला करावाच लागत नाही. आज, अफगानिस्तान मधील युद्धाची स्थिती त्रिशंकु सारखी आहे. त्या युद्धात केवळ अमेरिकेचे १,०७५ योद्धांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याचप्रमाणे, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इ. देशांचे सुद्धा असेच शेकडोंनी योद्धे मारले गेले आहेत. शिवाय, सगळ्यांचे मिळून १०,००० च्यावर कुठल्या न कुठल्या स्वरुपात जखमी आहेत. अमेरिकेने अब्जावदी डॉलर्स ह्या युद्धात खर्च केले आहेत. इराक मधे तर केवळ अमेरिकेची ५,००० हून अधिक लोकं मृत्युमुखी पडली आहेत. इराक व अफगानिस्तान मधील युद्धामुळे अमेरिकेची आर्थिक परिस्थिती  कशी डबघाईला आलेली आहे हे आपण पहात आहोतच.

आपण जर युद्ध पुकारायचे मनात आणले, तर हजारोंच्या संख्येनी गेलेली प्राणांची आहुति, कोटींच्या पटीत पैशांचा खर्च करून, खरच अतिरेकी कारवाया बंद होणार आहेत का? आज अल कायदाला अमेरिकेचं नुकसान करण्यासाठी अमेरिके पर्यंत जायची सुद्धा गरज नाही उरली. केवळ $४,२०० डॉलर खर्चून त्यांना अमेरिका व युरोप मधील हवाई मालवहातूक अनेक दिवसांसाठी ठप्प करता आली. कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान झाले. ह्यात जरी जीव हानी झाली नाही, तरी भिती निर्माण करून नुकसान करता आलेच आहे.

वरील गोष्टी जर लक्षात घेतल्या, तर युद्ध हा फार फायदेशीर पर्याय वाटत नाही. पाकिस्तानला वेठीस धरून त्यांना ह्या छावण्या बंद पाडायला भाग पाडण्यास अन्य आर्थिक मार्ग आहेत, त्याचा विचार आपण करायला हवा. असे मार्ग अन्य देशांच्या बाबती चीनने अवलंबलेले आहेत. आपण त्यातून बोध घेतला पाहिजे.

तात्पर्य, चालू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला विश्वातील सर्वात जुन्या लोकशाही मधे आणि सर्वात मोठ्या लोकशाही मधे, वेळ लागतोच. पण वेळ लागतो हे कारण, तो मार्ग सोडण्यासाठी होऊ शकत नाही.

तळ टीप १: प्लॅटफॉर्म तिकिट न घेता प्लॅटफॉर्मवर प्रवेश केल्याचा गुन्ह्याचे कलम सुद्धा कसाब विरुद्ध लावण्यात आलेले आहे.

तळ टीप २: माझे विचार तुम्हाला पटतीलच असे नाही. पण, हे एकदा वाचायला आणि ह्यावर विचार करायला हरकत काय आहे?
थोडंसं २६/११ विषयीSocialTwist Tell-a-Friend

४ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

विनय, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असणारच आणि प्रत्येक मताचा आपण आदरच केला पाहिजे. कारण ते प्रत्येकाचं स्वतंत्र मत आहे.

लेखातले काही मुद्दे पटले नाहीत. कसाबची चार्जशीट किती मोठी आहे वगैरे कारणं सांगून उलट मिडिया खटल्याला एवढा वेळ लागणं कसं समर्थनीय आहे हे जनतेला पटवून सांगते आहे असं मला तरी वाटतं. कसाबचा गुन्हा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे त्यासाठी कोर्टानेही त्या खटल्याला वेगळी वागणूक दिली पाहिजे असं मला वाटतं. तेच ते रोज आठ तास खटला, उन्हाळी सुट्ट्या वगैरे पोरकटपणा बंद करून जलद गतीने (लागल्यास २४*७) काम केलं पाहिजे. कसाबला वेळीच शिक्षा झाली तरच हल्ल्याच्या सूत्रधारांना योग्य संदेश पोचेल.

दुसरी गोष्ट म्हणजे ओक्लाहोमाची घटना ९/११ किंवा २६/११ च्या तुलनेत अतिशय सामान्य होती त्यामुळे त्याला एवढा वेळ लागला तरी कोणाला काही वाटणार नाही.

Afterall, Justice delayed is justice denied !!!

मी फक्त माझं मत मांडलं. तुमच्या मताचा आदरच आहे. गैरसमज नसावा..

sharayu म्हणाले...

कसाबला शिक्षा देताना त्याला मुस्लीमानी हुतात्मा बनवू नये याची काळजी घेण्याची गरज आहे.

Vinay म्हणाले...

हेरंब,
कसाब वरचा खटला दररोज, केवळ साप्ताहिक सुट्टी वगळता दिवसभर चालायचा. २४*७ त्याचा खटला चालू ठेवणे अशक्य आहे.शेवटी न्यायदान करणारे न्यायाधीशही मानवच आहेत. त्यात गुन्ह्याची कलमं आणि ती सिद्ध करताना वापरलेली प्रक्रिया, हे समजून घेण्यास वेळ लागतो. मग, निर्णय देताना जे तर्क वापरले गेले आहेत, त्या विरोधात पुर्वी उच्च अगर सर्वोच्च न्यायालांनी निर्णय दिला आहे का, असं सगळं तपासून मगच निर्णय देता येतो. न्यायाधीश तहलियानींनी कसाबच्या वकीलाचे वेळ काढू पण चालू दिले नाही आणि तो वकील कोर्टाचं ऐकत नाही, हे पाहिल्यावर त्याला बडतर्फ केलं होतं. हे सगळं कशासाठी? तर खटला सुरळीतपणे चालावा आणि त्याचा निकाल वेळेत लागावा, ह्याच साठी.

ओकलाहोमाची घटना सामान्य कशी म्हणता येईल? १६८ लोकांचा जीव गेला आणि जवळापास ७०० लोकं जखमी झाली. तुलनेने मुंबई हल्ल्यात १६६ मृत्युमुखी आणि केवळ २९३ जखमी (स्रोत: विकीपिडिया). म्हणजे फार तर, मुंबई आणि ओकलाहोमा हे समान दर्जाचे हल्ले झाले.

शरयु,
कसाब आपल्या इथे हुतात्मा होण्याची शक्यता कमी आहे. पण अतिरेकी छावण्यांमधे त्याचा हुतात्मा केला जाईल हे नक्की. आजही त्याचा इतर साथीदारांना त्या छावाण्यांमधे हुतात्माचा दर्जा मिळाला सुद्धा असेल.

Panchtarankit म्हणाले...

कसाब ला शिक्षा होऊ नये ह्या मताचा मी आहे
मुळात कसाब कोण आहे
तर पाकिस्तानमधील गरीब कुटुंबातील बेरोजगार मुलगा जो माथेफिरू पैशासाठी झाला.
तो फक्त प्यादे आहे.
वजीरावर निशाणा साधता आला पाहिजे.
कसाब च्या नावाने त्याला हुतात्मा व खास मुस्लीम शब्द गाजी करून अजून १०० कसाब एका दिवसात तयार होतील.
सध्या सीमेपलीकडे नाटो व अमेरेकी व पाकिस्तानी सैन्यावर १६ वर्षीय आत्मघाती हल्ले खोर शेकड्याने तयार आहेत.
भारतात मानवी मुस्लीम बॉंब अजून आला नाहि आहे तो कसाब ला फासी दिल्यावर येईल.
साहेबांचा आदर्श ठेवा
आणि अंदमान पुनर्जीवित करा.
हात्तात त्याच्या १६ तास दिवसाचे कोलू द्या
अपुरे आन्न्न , कुपोषण , रोगराई ह्यामुळे शय रोगाने त्यास मारू द्या.