क्रिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्रिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑक्टोबर २६, २०११

भले भले आले आणि मातीत मिळून गेले!

भारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं होतं. त्यानंतर तो मध्य आशिया जिंकत भारताच्या वेशी वर पोहोचला होता. त्याने भले ही पुरू राजाला हरविले असेल, पण त्या युद्धात त्याचा सैन्याने इतकी कच खाल्ली की तिने पुढे जायचा नकार दिला. सिकंदराला गंगा नदीच्या किनाऱ्या वरूनच परतावे लागले. त्यानंतर त्याच्या सामराज्यात कसलीच ताकद उरली नाही आणि त्याचा मृत्यु नंतर ते काही दशकातच कोसळलं. त्यानंतर कालांतराने आक्रमणकरते येत होते, ह्या देशावर आपली सत्ता बसवीत होते, पण त्यांना कालांतराने ह्या देशाचा भाग तरी व्हावं लागलं किंवा देश सोडून परत जावं लागलं. सदाशिवराव भाऊंना पानिपतात हरविणारा अहमदशहा अब्दालीला सुद्धा पुन्हा भारता कडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही. एवढी हानी त्याचा सैन्याला मराठी फौजांनी केली.  इंग्रज, पोर्तुगीज, इ. युरोपीय आक्रमणकरते सुद्धा आले, आणि आपल्यावर राज्य सुद्धा केले. पण, अमेरिकी खंडात त्यांनी स्थानिकांचं अस्तित्वच जसं नामशेष केलं, तसं इथे त्यांना जमलं नाही. उलट त्यांची ह्यात बरीच हानि झाली. आणि अखेरीस त्यांना हा देश सोडून द्यावा लागला.

आणि आता भारताचा हाच लौकिक खेळात सुद्धा पहायला मिळत आहे. विशेष करून क्रिकेट मधे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत भारतात येणार्‍या संघाने केवळ २ वेळाच भारतीय संघाला पराभूत केले आहे. आणि तसंच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड-भारत एकदिवसीय स्पर्धेत सुद्धा घडलं. सिकंदर प्रमाणेच अगदी महिन्या-दीड महिन्यापूर्वी भारताला नेस्तनाबूद करणार्‍या इंग्लंडचा भारतीय संघाने इथे भारतात त्यांचा सिकंदर करून टाकला. ५-० विजय मिळवून सपेशल दाखवून दिलं की आम्ही विश्वचषक विजेते कसे झालो! ज्याप्रमाणे सिकंदरला भारतातून पराभव व नामुष्की पतकरून परत जावे लागले, त्याचप्रमाणे इंग्लंडचा संघ इथे मोठ्या वल्गना करत आला असता, त्यांना नामुष्की पदरात घेऊनच माय देशी परत जावे लागले.

भारतीय संघाच्या ह्या कामगिरी बद्दल त्यांचे सपेशल अभिनंदन. आणि सचिन, जहीर, युवराज, हरभजन व सेहवाग नसताना ही कामगिरी बजावल्या बद्दल खेळाडूंचे अधिकच कौतुक करावेसे वाटते.
भले भले आले आणि मातीत मिळून गेले!SocialTwist Tell-a-Friend

रविवार, एप्रिल १७, २०११

का पूजितो त्यास आम्ही??

भारताने क्रिकेट विश्व चषक जिंकल्यावर पुन्हा एकदा एकच चर्चा पुढे आली. ह्या देशात क्रिकेट खेळ नसून धर्म आहे. आम्ही इतर खेळांना तेवढे प्राधान्य देत नाही, वगैरे, वगैरे. क्रिकेटच्या अनुयायांनी पुन्हा जुन्या घोषणा उफाळून आणल्या. "Cricket is my religion, Sachin is my God." क्रिकेट हा धर्म असेल, तर सचिन आमुचा दैवत आहे. महेन्द्र ढोणी पासून जहीर खान पर्यंत आणि शेजारच्या पान टपरीवाल्या पासून ते पंचतारांकित हॉटेल मधील हेड-शेफ पर्यंत सगळेच असे म्हणतात. आणि ते योग्यच आहे.

अनेक विचारवंत असंही मत मांडतात, की क्रिकेटच्या वेळी देशात जी एकता दिसून येते, ती पुढे पण टिकली पाहिजे. पण हल्लीच्या वातावरणात, क्रिकेट शिवाय दुसरी कुठली गोष्ट आम्हाला एकत्र आणू शकणार आहे? राजकारणी स्वत:ची झोळी भरण्याच्या नादात गुंतले आहेत. एका मागून एक घोटाळे बाहेर निघत आहेत. आणि ह्या घोटाळ्यां मधे कुणालाही आज पर्यंत शिक्षा झालेली नाही! ह्या घोटाळ्यांचं नुकसान बघितलं की धडकीच भरते. ७०,००० कोटींचा कॉमन वेल्थ घोटाळा काय, १,७६,००० कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा काय. आता बहुतेक आकडे सुद्धा संपतील ह्या घोटाळ्यांचं आकलन करण्या साठी. ६४ कोटींचा बोफोर्स घोटाळा त्या मानाने अगदी लहान मुलांचा खेळ वाटायला लागलाय. भ्रष्टाचाराचा राक्षस सगळीकडे फोफावलाय. 

हे काय कमी होतं, तर मतांचं राजकारण खेळत, राजकारण्यांनी जनतेला जातीयवादात  अडकवलं आहे. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला जातीत आणि प्रातांत अडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मतं पाहिजेत म्हणून कधी मराठांना हाताशी धरलं तर कधी दलितांना, तर कधी सर्वांना एकत्र घेण्याची घोषणा झाली. दर पाच वर्षांनी पुन्हा तोच जाहिरनामा वाचून दाखवायचा आणि नवीन स्वप्न दाखवायची. भंग झालेल्या स्वप्नांचं दु:ख ह्यांना होत नाही, त्याचं वाईट वाटत नाही.

सरकारी अधिकारी एक कागद इकडचा तिकडे करायचे पैसे मागतो. तुमच्या हक्काचे पैसे आणि सवलती मिळविण्यासाठी तुम्हाला त्यांचा खिसा गरम आणि तुमचा खिसा रिता करावा लागतो. APMC मधील व्यापारी, माथाडी कामगार मिळून शेतकरी व ग्राहक, दोघांना लुटतात. रिक्षावाला पाहिजे त्या ठिकाणी यायला तयार नसतो, बस-कंडक्टर नेहमीच सुट्टे पैस्यांवरून वाद घालतो. एवढं सगळं निराश वातावरण आजू-बाजूला असताना, माणसानं प्रेरणेसाठी आणि दिलास्यासाठी कुठे बघावं?

आणि म्हणूनच मैदानावर स्वत:च्या कर्तबगारीने जग जिंकणार्‍या सचिन तेंडुलकर कडे आम्ही सगळेच भक्तिभावाने पाहतो. गेली २१-२२ वर्षं त्याने भारतीय क्रिकेटची धुरा एकट्याने संभाळली आहे. सचिन म्हणजेच भारतीय क्रिकेट, हे समीकरण अगदी हल्ली पर्यंत होतं. मॅच फिक्सिंगच्या घृणास्पद काळात सुद्धा त्याचावर कुणीही संशयाचं बोट सुद्धा ठेवू शकलं नाही. तो जेव्हा फलंदाजीसाठी क्रीजवर येतो, तेव्हा अखंड भारताच्या आशा घेऊन येतो, सफल झाला तर कित्येक कोटी लोकांना आपल्या रोजच्या कटकटीच्या जीवनातून आनंद मिळतो. पण असफल ठरला, तर कित्येकांना निराशेत बुडवू शकतो. त्याचं देवा सारखंच आहे. देव सुद्धा दर वेळेला आपल्या इच्छा पूर्ण करतोच असं नाही. आणि केल्या तरी, त्या पाहिजे त्या वेळेसच पूर्ण होतील असं ही नाही. बघा ना, सचिनचं शंभरावं शतक पाकिस्तान विरुद्ध यावं, अशी इच्छा असताना, ती पूर्ण झाली नाही. त्याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकावं ही इच्छा सुद्धा अपूरी राहिली. पण भारताने सामना जिंकावा, ही आपली इच्छा त्याने वारंवार पुरी केली आहे. त्याचाकडे क्रिकेट बद्दल कुठलाही नवस बोला, तो अनेक वेळा नवसाला पावतो.

अंधुक वाटणार्‍या परिस्थितीत तो, काही क्षणासाठी का होईना, आनंदाचा प्रकाश घेऊन येतो. आणि म्हणूनच तर तो आम्हाला पूजनीय वाटतो. केवळ युद्ध झालं तरच, आम्ही सगळे भारतीय एकत्र येऊन भारतीय सैन्याला आणि देशाला पाहिजे ती मदत करू. पण युद्ध कुणाला हवं आहे?
का पूजितो त्यास आम्ही??SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, फेब्रुवारी २६, २०११

क्रिकेट: फलंदाजाच्या बाजूने झुकलेला

सध्याच्या क्रिकेट विश्व चषकाच्या ज्वरामुळे क्रिकेट बद्दल वाचन जरा जास्तीच होत आहे. खेळा मधील तांत्रिक मुद्दे, त्याचा इतिहास, काही विवादास्पद घटना, त्यावरील तज्ञांचे,  खेळाडूंचे मत आणि त्यांची मानसिक परिस्थिती ह्या बद्दल वाचण्याची मजा काही औरच आहे. कारण मी क्रिकेट खेळून नव्हे, तर वाचून आणि बघून अधिक शिकलो आहे. 
क्रिकेटचा सुरवातीचा इतिहास पाहता, हा खेळ थोड्या फार प्रमाणात गोलंदाजांच्या पारड्यात झुकलेला दिसेल. त्यातील काही कारणं नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ, पिच रात्रभर उघडी (uncovered) ठेवल्याने, फलंदाजांकडे सुरक्षेचे फार उपाय नसल्याने आणि क्षेत्ररक्षणाची रचना करण्यास पूर्ण मुभा असल्याने. हळू-हळू  हे माप फलंदाजांच्या पारड्यात झुकू लागलं. आणि एक काळ असाही आला जिथे दोघांना समान संधी होत्या. पण त्यानंतर मात्र ते पारडं फलंदाजाच्या पारड्यात जे झुकायला लागलं, ते अजूनही तसच आहे. ह्याची कल्पना तुम्हाला समाजातील प्रतिक्रियांमधून दिसून येतील. आज कुठल्याही पालकाला विचारा, तो म्हणेल, माझा मुलगा सचीन सारखा क्रिकेटपटू व्हावा. फार क्वचीत कुणीतरी असा म्हणताना दिसेल, "माझा मुलगा अनिल कुंबळे सारखा क्रिकेटपटू व्हावा." समाजाने सुद्धा गोलंदाजांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. 

त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे "बॅकिंग अप". बॅकिंग अप म्हणजे, एकदा गोलंदाजाने धावायला सुरवात केली की नॉन-स्ट्रायकर एन्डला असलेला फलंदाज चेंडू टाकण्या आधीच पॉपिंग क्रीज़ मधून बाहेर येतो. ह्यामुळे त्याला पटकन धाव काढायची संधी मिळते. पण तो जर खूपच बाहेर गेला, तर गोलंदाजाला नॉन-स्ट्रायकरला धावचीत करता येतं. पण गोलंदाजाने असं केलं तर त्याच्या ह्या कृत्याला "unsportsmanlike behaviour", अर्थात खिलाडू वृत्तीचा अभाव, असं म्हण्टलं जातं. एवढच काय, तर बातमीदारां पासून समालोचक आणि तज्ञांपर्यंत सर्व त्या गोलंदाजाची चीर-फाड करतात. १९४७ साली विनू मंकडांनी बिल ब्राऊन ह्या ऑस्ट्रेलियन फलंदाला अशा रितीने धावचीत केल्यापासून्ह्या पद्धतीने बाद करण्यास "मंकडवले" (Mankaded) असं म्हणतात. ह्या घटनेनंतर ICC/MCC ने नियम बदलले आणि एकदा का गोलंदाजाने चेंडू फेकण्यासाठी हात फिरवला, तर त्याला नॉन-स्ट्रायकरला मंकडवता येत नाही. म्हणजे, पुन्हा एकदा फलंदाजाच्या सोयीचा निर्णय झाला.

नॉन-स्ट्रायकरला मंकवडलं नाही तर गोलंदाजाच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक केलं जातं. कोर्टनी वॉल्शने १९८७ साली पाकिस्तानच्या सलीम जाफरला न मंकडवता केवळ चेतावनी देऊन सोडलं. त्यामुळे वॉल्शचं जगभर कौतुक झालं. पण पाकिस्तानने मॅच जिंकली. ह्याचा तोटा वेस्ट इंडीजला झाला. जर वॉल्शने जाफरला बाद केलं असतं तर वर्ल्ड कपचं चित्र वेगळं असू शकलं असतं.

मंकवडल्याने गोलंदाजाची अखिलाडू वृत्ती (खिलाडू वृत्तीचा अभाव) दिसते. पण चेंडू फेकला देखील नसताना क्रीज सोडून धाव घेण्यास सुरू करण्यात फलंदाजाचा अखिलाडूपणा नाही का? "चीकी सिंगल"च्या परिस्थितीत हा क्षेत्ररक्षण करणार्‍यांवर अन्याय ठरत नाही का? एक वॅलिड चेंडू पडल्या अगोदरच एका वॅलिड धाव घेण्याचा प्रयत्न हे परस्परविरोधी वाटत नाही का? क्रिकेटचे नियम म्हणतात की चेंडू पूर्ण फेकून होई पर्यंत नॉन-स्ट्रायकरने क्रीज सोडू नये आणि तसे केल्यास तो धावचीत केला जाऊ शकतो. तर मग त्या प्रकारे बाद केल्यास गोलंदाज अखिलाडू का ठरतो.  बहुमत असं आहे, की नॉन-स्ट्रायकर चुकून क्रीजच्या बाहेर जातो. ज्या फलंदाजाला आपली क्रीज माहित नाही, तो काय फलंदाजी करणार? पण त्याला केवळ चेतावनी देऊन सोडलं आणि त्या फलंदाजाने पुढे शतक ठोकलं, तर मग? किंवा मॅच-विनिंग डाव खेळला तर? त्याचा ह्या चुकीचं फळ क्षेत्ररक्षण करण्यार्‍या संघाने का भोगावं? आंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला त्यातील ठळक नियम माहित असतात. उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूंना बारकावे पण माहित असतात. तर मग फलंदाजाने नियमाचे उल्लंघन का करावे? आणि नियमांच्या चौकटीत राहून सुद्धा गोलंदाजाने टिका का सहन करावी? एकंदर काय, तर क्रिकेट हा batsman centric (फलंदाजी केंद्रीत) खेळ झाल्याने गोलंदाजी/क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाचे हात जितके बांधता येतील तितके बांधण्यात आले आहेत.
क्रिकेट: फलंदाजाच्या बाजूने झुकलेलाSocialTwist Tell-a-Friend