समीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, एप्रिल ०५, २०१०

द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा

कल्पना करा, जर भगवान शंकर, आपल्या पुराणांमधे सांगितल्या प्रमाणे भगवान नसून, एक साधरण मानव असते, ज्याला त्याच्या कर्मांमुळे "महादेव" ही पदवी लाभते. असं असतं तर इतिहासात काय झालं असतं? महादेव ही पदवी धारण करणारा धरती वरील त्याच्या कर्मामुळेच त्या पदवीवर पोहचत असेल तर?

ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अमीश ह्यांच्या "द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा" मधे. वास्तविक मेलुहा एक प्राचीन भारतातील उत्तर-पश्चीमेकडील (बहुतेक नैऋत्य, आपला मराठीतील दिशांचा खूप गोंधळ होतो, बुवा) एक प्रगत राज्य होतं. लोहथल, मोहन-जो-दारो, हडप्पा ही मेलुहातील शहरं. तर अमीश ह्यांनी इतिहास आणि पुराण कथा, ह्यांचा मेळ घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, हे पुस्तक इतिहास आणि दंत-कथा ह्यांच्या आधारावर लिहिले आहे.

कथेची सुरुवात होते कैलासातील मानसरोवराजवळ. दिनचर्या आटोपून शिव, त्यांचे गण आणि उरलेला कबीला संध्याकाळी थोडी विश्रांती घेत असताना पाकृती समाजातील लोकं त्यांच्यावर हल्ला करतात. ह्या पाकृती कबील्याला मानसरोवरावर स्वत:चं वर्चस्व स्थापित करायचं असतं. त्या दिवशी मेलुहातील काही सैनिक वाट हरवून शिवाच्या गणांच्या ताब्यात सापडलेले असतात. त्यांच्या सेनापतीचे नाव असते नंदी. तर हे सैनिक शिवाच्या गणांबरोबर पाकृती कबील्याच्या सैनिकांचा हल्ला परतवून लावतात. शिव ह्या रोजच्या युद्धाला पार कंटाळतो. त्यातच नंदी त्याच्या समोर एक प्रस्ताव मांडतो. तू तुझ्या कबील्या सोबत जर मेलुहाला आलास, तर ते इथल्यापेक्षा चांगलं आयुष्य जगतील. रोजच्या मारामारीला कंटाळलेला शिव कबील्याबरोबर मानसरोवर सोडून मेलुहाला येतो.

तिथे पहिल्या दिवशी त्याच्या कबील्याला औषध पाजलं जातं आणि त्यांना एका तात्पुरत्या निवासस्थानी ठेवण्यात येतं "क्वॉरंटाईन" मधे. पहिल्या रात्रीच शिवाचा अख्खा कबीला तापाने फणफणायला लागतो. केवळ शिवाला ताप येत नाही, फक्त तो घामाने डबडबून जातो. मेलुहातील वैद्य तातडीने रुग्णांची सुश्रुशा करायला लागतात. त्यांची मुख्य वैद्य शिवाला आंघोळ करायला सांगते. आंघोळ करून शिव येतो, तर त्याला आपला घसा एकदम थंड झाल्या सारखा जाणवतो. त्याला पाहून मुख्य वैद्य आश्चर्याने जवळ-जवळ बेशुद्ध होते. कारण विचारल्यास ती त्याला म्हणते, "हे प्रभू! आपण प्रकटलात!! आमचा उद्धार झाला!!"

तिचं असं बेशुद्ध पडण्याचं कारण काय? मेलुहा मधे ज्या तारणहारा बद्दल दंतकथा प्रसिद्ध आहेत, त्यात शिव बसतो का? आणि बसला तर तो नियती ने त्याच्या गळ्यात घातलेल्या कार्याला पूर्णत्वास नेण्यास तो तयार होईल का? अमीशने अतीशय सुरेख रित्या शिवाची ही कहाणी लिहिलेली आहे. शिव सर्वसाधारण माणूस असल्याने माणसाच्या सगळ्या प्रवृत्त्या त्याच्या आढळतात. उदाहरणार्थ, पुण्यवान कोण, पापी कोण, ह्याच्या व्याख्या तो स्वत: जाणून घेत नाही तर मेलुही प्रजेत रूढ झालेल्या व्याख्यांवर विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्येक टप्प्यावर जाणवतं की जे दिसतं तसं नसतं. त्यामुळे तो व्यथित होतो. त्याची ही व्यथा दूर करणारे आणि त्याला त्याच्या उद्देश्याच्या जवळ घेऊन जाणारे कोण आहेत? ह्या सगळ्या कार्या मधे सतीचा, नंदीचा आणि गणांचा काय सहभाग आहे? त्यांची भूमीका सुद्धा एकदम सुरेख पद्धतीने मांडली आहे!

द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा हे शिवावरील त्रिखंडीय पुस्तकांपैकी पहिलं खंड आहे. ह्यातला दुसरा खंड सुद्धा लवकरच बाजारात येत आहे. आणि हे पुस्तक वाचल्यावर दुसर्‍या खंडाच्या आगमनाची उत्कंठता नक्कीच वाढेल!
द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहाSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, नोव्हेंबर २७, २००९

शांताराम: समीक्षा

हे पुस्तक बाजारात येऊन काही वर्षं झाली आहेत. पण हे माझ्या हाती गेल्या महिन्यातच पडलं. त्यामुळे त्याची ही समीक्षा करण्यास लौकिक दृष्टया उशीर झाला आहे. आणि ही समीक्षा वाचून ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स ला काहीही फरक पडणार नाही. तरी पण, पुणेकर असल्याने आपल्या मताची पिंकं टाकणं गरजेचं आहे. असो, पुस्तक असो वा नाटक वा सिनेमा, समीक्षेच्या बाबतीत मी अत्यंत टुकार आहे. तस्मात् लोकांनी हे वाचून निराश होऊ नये.

तर आपण सर्व जाणता की शांताराम ही ग्रेगरीची आत्मकथा आहे. त्याने जाहीर रित्या ह्याची कबुली दिल्याचे स्मरत नाही, पण एकंदरीत वाचल्यावर हे लक्षात येतं. साधारण पणे १९८०-१९९२ दरम्यानच्या त्याच्या मुबंईतील कृत्यांची ही कहानी आहे. त्याने ज्या प्रकारे सगळ्या ठिकणांचं आणि घटनांचं विस्तृत वर्णन केलय, त्यावरून हे लक्षात येतं की तो त्यात असल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. कोणताही डॉन असंच कुणालाही आपल्या कारवाया सांगणार नाही. तरीपण, शांताराम बद्दल माझं असं मत आहे. कल्पना करा, तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी रोजनिशी लिहिता. नित्य नियमाने, न चुकता. त्यात दिवसभराच्या साऱ्या घटनांची तपशीलवार नोंद करता. आणि हा विधि न चुकता १०-१५ वर्षं चालु ठेवता. ह्या कालावधीच्या शेवटी तुम्ही त्या रोजनिशितील मसालेदार किस्से निवडता आणि त्यांना व्यवस्थित पणे जोडता. जिथे जोडता येत नाही, तिथे नवीन चॅप्टर्स बनवता। हे सगळं करून ते छापून आणा. तुमचं शांताराम तयार झालं. अर्थात ते त्या पुस्तका प्रमाणे प्रसिद्ध होण्यासाठी तुम्ही सुद्धा ग्रेगरी सारखं आयुष्य जगलं असलं पाहिजे. ९-५ नोकरी करून आणि सुट्टी असली की दुपारचं निस्त्याचं खाऊन एक मस्तं झोप काढून शांताराम तयार होत नाही. हे पुस्तक आकाराने अर्ध केलं तरी काहीही फरक पडणार नाही. काही ठिकाणी उगाचाची री ओढलेली असल्या सारखी वाटते. पण कुठलाही प्रसंग प्रस्तुत करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. ज्या मुंबई शहराची घाई प्रसिद्ध आहे, त्या घाईला ह्या पुस्तकात सपेशल बगल देण्यात आली आहे. पण ह्यात एक अत्यंत शरमनाक बाब ही आहे की त्यात त्याने सरकारी व्यवस्थेतील सगळा नाकर्तेपणा उघडा केला आहे. पोलिस आणि अंडर वर्ल्ड मधले संबंध, कस्टम आणि पोलिसांमधली लाचखोरी, वगैरे सविस्तर पणे दिलेली आहे. मुंबईतून खोट्या पासपोर्ट, व्हिसा, नोटा, वगैरेचे धंदे कसे व कुठे चालतात ह्याची तपशीलवार माहिती त्याने दिली आहे. आणि एवढं सगळं असताना आपण अगदी कौतुकाने ग्रेगरी कडे पाहतो. तो आपल्या व्यवस्थेला नागडी करून गेला. जमेची बाजू एवढीच की तो इतर राज्यातून आलेल्या लोकांपेक्षा लवकर मराठी शिकला आणि बोलायला लागला.
शांताराम: समीक्षाSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, जुलै ३०, २००९

अवघा रंग एकचि झाला

काल बरेच वर्षांनी नाटक पाहिला गेलो. शेवटचं नाटक पाहिलं होतं सही रे सही. त्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी हे नाटक पाहिलं. अवघा रंग एकचि झाला. ह्या नाटका बद्दल अनेक जणांकडून चांगलं ऐकलं होतं, त्यामुळे ते बघावसं वाटत तर होतं. त्यात, झी मराठी वर अमोल बावडेकर ने सादर केलेलं "रंग रंग, पांडुरंगी रंग रंग", हे गाणं ऐकून माझी हे नाटक बघायची इच्छा अजूनच तीव्र झाली. त्यात हे संगीत नाटक. आमच्या पिढीला संगीत नाटक कधी पाहायला मिळालं नाही. म्हणून एकदा संगीत नाटक कसं असतं हे पण बघायचं होतं. काल योग जुळून आल्याने, हे सगळं एकदाचं जमलं.

नाटकाबद्दल म्हणायचं तर, नाटक खूपच छान आहे. नाटकातली कीर्तनं आणि इतर गाणी सुद्धा अप्रतीम आहेत. नाटकाच्या कथेचा पाया जरी जुना असला (दोन पिढींच्या विचारां मधला फरक) तरी कुठे कुठे हा फरक दिसतो, हे मात्र बघण्या सारखं आहे. विशेष म्हणजे, संगीत नाटक असून देखील, ते गाण्यांनी गजबजलं नाहीये. नाटकातले अनेक विनोदी क्षण गंभीर वातावरणात थोडा दिलासा देऊन जातात. नाटकातील पात्रांचा अभिनय उत्तम आहे. प्रसाद सावकारां सारखे दिग्गज कलाकाराच्या जोडीला, स्वरांगी मराठे सारखी उगवती कलाकार पण आहे. पार सावकारांपासून ते स्वरांगी पर्यंत सर्व नटांनी आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय, संगीत नाटक असल्याने गायन सुद्धा सुरेख असणे गरजेचे आहे. ह्या क्षेत्रातही सर्वांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे. अमोल बावडेकरला आपण सा-रे-ग-म-प आजचा आवाज, मधे ऐकलं आहेच. त्याचा गायनावर सुरेश वाडकरांची छाप आहे. विशेष म्हणजे, स्वरांगीचा आवाज सुद्धा अतिशय गोड आणि सुमधुरआहे. कठीण-कठीण-कठीण किती, ह्या गाण्यावर, स्वरांगीला वन्स मोर मिळाला, आणि तिने सुद्धा खिलाडू वृत्तीने पुन्हा एकदा त्या गाण्यातले एक पद म्हणून दाखवले.

नाटकाचा शेवट फक्त जरा घाई-गडबडीत केल्या सारखा वाटतो. म्हणजे कसं, मंगलाष्टकं जर लांबली, तर मुहूर्त चुकू नये म्हणून भटजींची कशी घाई होते, तसं ह्या नाटकातल्या शेवटा बद्दल वाटलं. पण नाटकाच्या शेवटाला, स्वरांगी आणि अमोल रंगमंचा वरून उतरून प्रेक्षकांमधे आले आणि सर्व नाट्यरसिकांचं अभिवादन स्वीकारलं. नाटकाचा शेवट करण्याची ही अभिनव पद्धत मला खूप आवडली.

दुसरं म्हणजे आमच्या आजी-आजोबां बरोबर संगीत नाटकाला दाद देणारी पिढी सुद्धा लोप पावल्या सारखी वाटली. कारण नाट्यगृहात, कुणीही गाण्याला टाळ्यांखेरीज इतर दाद देत नव्हतं. आता आम्ही असं ऐकलं आहे, की संगीत नाटकामधे दिग्गजांनी प्रत्येक गाण्याला वन्स मोर मिळवला आहे. ते त्यांचं कर्तृत्व आहेच, शिवाय त्या कलेची जाण असलेल्या प्रेक्षांचा सुद्धा त्यात वाटा आहे. ह्या नाटकातली बरीचशी गाणी वन्स मोर घेण्या सारखी होती, पण फक्त स्वरांगीच्या गाण्याला वन्स मोर मिळाला.

जाता-जाता एक सांगायला हरकत नाही. अमोल बावडेकर आणि माझं नातं लागतं. मला सारखं त्याला जाऊन भेटावसं वाटत होतं. पण ते जमेल असं दिसत नव्हतं. मी आणि सुशांत, परत ठाणे स्टेशनला चालत आलो. लोकल साठी उभे होतो, तेवढ्यात अमोल आणि जान्हवी पणशीकर सुद्धा त्याच लोकल साठी आले. सुशांत आणि मी अमोल्च्या मागून त्याच डब्यात शिरलो. ट्रेन मधे अमोलशी ओळख करून घेतली. ठाणे ते कांजूर, त्याचाशी १० मिनिटे गप्पा मारल्या. अमोल सुद्धा मन मोकळे पणाने बोलला. नातं असल्याने, एकमेकांना घरी येण्याचे आमंत्रण देण्यात आले. बघू आता तो कधी आमच्या घरी येतो ते. तो पर्यंत, तुम्ही पहायला विसरू नका- अवघा रंग एकचि झाला.

अवघा रंग एकचि झालाSocialTwist Tell-a-Friend

रविवार, एप्रिल २६, २००९

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा

आता पर्यंत तुम्ही मी शिवाजी राजे भोसले बोलतोय च्या बर्‍याच समीक्षा वाचल्या असतील. म्हणूनच ही समीक्षा नसून एक प्रोत्साहन आहे. तुम्हाला हा सिनेमा बघण्यासाठीचं. हा सिनेमा जरूर बघा. कारण महाराजांचे बोल कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ह्या सिनेमा मधे, महाराजांनी केलेला उपदेश अमुल्य आहे. तो केवळ मराठी माणसाला लागू होत नसून स्वाभिमानाने जगू इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी आहे.

ह्या सिनेमात उगीचच "मराठी संस्कृतीचं" उदो-उदो केलं जात नाही. मधू सप्रे, विदिशा पावटे, मुग्धा गोडसे, ह्यांचं कौतुक दादा फाळके, आशुतोष गोवारीकर, अनिक काकोडकर, इ. एवढेच केले आहे. म्हणजे, मराठी माणूस जसा pioneer आहे, तसा आधुनिक पण आहे. ह्या सिनेमातील नायक आपल्या मुलीला उगाचच मध्यम वर्गीय संस्कृतीच्या नावा खाली सिनेमात भाग घेण्यापासून रोखत नाही.

दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचं दिनकरराव भोसलें बरोबर संभाषण. त्यातले काही संवाद जिव्हारी लागतात. उदाहरणार्थ: "स्वराज्याचे तोरण फुल-बाजारात विकत मिळत नाही. त्या साठी युद्ध करावं लागतं, प्राणांची आहुती द्यावी लागते." अजून एक: "आमची कुठेही शाखा नाही अशी पाटी लावता. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान बाळगता", अशी मराठी हॉटेल-खानावळी चालवणार्‍यांवर टीका, खरीच पटते.

तिसरं म्हणजे मकरंद अनासपुरेचं कॉमिक टाईमिंग आणि संवाद. "केसभर गजरा आणि गावभर नजरा". ह्या व्यतिरिक्त, ह्या सिनेमात समाजातल्या अनेक समस्या दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम व्यावसायिक आणि महानगर पालिकेतील कर्मचार्‍यांची जुगलबंदी, त्यातून होणारा सामान्य माणसाला त्रास. शिक्षण सम्राटांची मनमानी आणि जीव घेण्या स्पर्धेमुळे अर्ध्या टक्क्याने मार्क कमी झाल्याने पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश न मिळणे.

एकूणच हा सिनेमा पाहिला तर एवढे लक्षात येतं की स्वाभिमानाने जगायचं असेल तर त्यासाठी लढावं लागणार. कारण आजच्या परिस्थितीला आपला नाकर्तेपणाच जवाबदार आहे. शिवाजी जन्माला यावा आणि तो सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरात.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहाSocialTwist Tell-a-Friend