शनिवार, फेब्रुवारी २८, २००९

रहमानचा जय हो, पण....

अल्ला रखा रहमान (हे रहमानचं पूर्ण नाव) आणि गुलज़ारना स्लमडॉग मिलिनीयरच्या शीर्षक गीतासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. सगळ्यांना (आणि मला सुद्धा) खूप आनंद झाला. एवढा की आमचा आनंद गगनात मावेना. भारतीय संगीताला परदेशात सन्मान मिळाला ही खूपच अभिमानास्पद बाब आहे.

रहमानचा मी रोजा पासून चाहता आहे. त्याने हिंदी चित्रपट संगीतात एक नवीन क्रांती आणली. नाहीतर आपण आजही अनू मलिकची "प्रेरीत" गाणी ऐकत बसलो असतो. रहमान मुळे अनू मलिकवर आळा बसला आणि तो सध्या "इंडियन आयडल" मधे जावेद अख्तरांचा विरोध करत बसतो. रहमानच्या सगळ्या हिंदी चित्रपटांतील गाणी माझ्या कडे आहेत. अनेक वेळा त्याची तामिळ गाणी पण मी ऐकतो. त्याचे संगीत एवढे बेधुंद करणारे आहे की भाषेचा कोठेही अडथळा जाणवत नाही.

एवढे सगळे असूनही रहमानने टाईम्स ऑफ इंडीया ह्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं म्हंटलं- "This award legitimises our music and the aspirations of hundreds of other musicians." का? असं का? रहमान कडे आजही भारतातले अनेक होतकरू संगीतकार आदर्श म्हणून बघतात. आणि तो आदर्श राहण्यासाठी त्याचे संगीत पुरेसे आहे. त्यासाठी ऑस्कर पारितोषिकाची गरज नाही. आपण आपल्या संगीताला मान्यता मिळण्यासाठी पाश्चात्य देशांकडे बघायची काय गरज आहे? रहमान सारख्या अनेक कलाकारांबद्दल भारतवासीयांना असीम प्रेम आणि आदर वाटतो. पण त्यासाठी ऑस्करची गरज खरचं आहे का? हिन्दुस्तानी, कार्नाटिक संगीत मधले अनेक गायक आणि वादक ऑस्कर न मिळता सुद्धा आम्हाला अत्यंत प्रिय आहेतच ना? चित्रपट संगीत म्हंटलं तर महम्म्द रफ़ी, मुकेश, लता मंगेशकर, इ. कलाकार आम्हाला सध्याच्या पिढीतल्या गायकांपेक्षा अधिक प्रिय आहेत. लतादीदी आणि आशा-ताई (खरं म्हणजे माझ्या मावशी-आत्यांच्या वयाच्या आहेत ह्या दोघी) तर केवळ भारतात नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कलेवर प्रेम करण्यासाठी कु्ठल्याही पाश्चिमात्य पुरस्काराची गरज नव्हती.

असो. रहमानला ऑस्कर मिळाला त्यात आनंद आहे, अभिमान पण आहे, तरीपण असं वाटतं की त्याने हे वक्तव्य करायची गरज नव्हती. कलाकाराच्या गुणांना भारतीय लोकांनी नेहमीच सन्मान दिला आहे, त्यांना आपल्या हृदयात वेगळं स्थान दिलेलं आहे. म्हणूनच पु.ल., ग.दि.मा., सुधीर फडके, महम्मद रफ़ी, इ. कलाकारांना आजही अनेक लोकं आदर्श मानतात आणि त्यांचा सन्मानही करतात.
रहमानचा जय हो, पण....SocialTwist Tell-a-Friend

शनिवार, जानेवारी २४, २००९

देवळातील एक दिवस

गोवा म्हंटलं तर सगळ्यांना आठवतात तिथले समुद्र किनारे, त्यावर वावरणारे परदेशी पर्यटक (विशेष करून स्त्री-पर्यटक) आणि पाण्या एवढी स्वस्त दारू. पण माझ्या साठी गोवा म्हणजे ह्यातलं काही नसतं. माझ्यासाठी गोवा म्हणजे मस्त डोंगरांच्या मधे लपलेलं शांतादुर्गेचं देऊळ, समोर असलेली मारूतीची टेकडी, सकाळचा देवीला सोवळं नेसून केलेला अभिषेक, दुपारी देवीची आरती, त्यानंतर पुरोहितांकडे गरम-गरम अस्सल कोकणी पद्धतीचा आमटी-भात, संध्याकाळी देवळाच्या आवारात निवांतपणे मारलेल्या गप्पा, रात्रीचं कीर्तन आणि आरती आणि आरती नंतर मिळणारा प्रसाद.

शांतादुर्गेच्या देवळातला गाभारा म्हणजे एक छोटी जत्राच असते. तेथील महाजनांचे पुरोहित ठरलेले असल्याने, एक पुरोहित ५-६ जणांना घेऊन देवीच्या अभिषेकला बसतात. देवीचा अभिषेक दोन भागात पार पडतो. पहिल्या भागात गणपती पूजा, संकल्प, इ. केलं जातं. त्यासाठी देवीच्या आसनासमोर खाली बसायला असलेली जागा वापरतात. तदनंतरच्या भागात देवीच्या मूर्तीवर अभिषेक होतो. एका पुरोहितांचे महाजन देवीवर अभिषेक करायला लागले, की दुसरे पुरोहित आणि त्यांचे महाजन गणपतीच्या पूजेला सुरुवात करतात. इथपासून खरा विस्मय सुरू होतो. आता तुम्हाला लक्षात येईल की मी गाभाऱ्याला छोटी जत्रा का म्हंटलं. महाजनांचा एक गट देवीवर अभिषेक करत असतो. त्या गटासाठी त्यांचे पुरोहित मोठ्या आवाजात मंत्र म्हणत असतात. त्याच वेळेस दुसरा गट त्यांच्या पुरोहितां बरोबर खाली गणपती पूजेला बसलेला असतो. त्या गटासाठी त्यांचे पुरोहित गणपती पूजेचे, संकल्प सोडण्याचे इ. मंत्र म्हणत असतात. हे सगळं एकाच वेळी चालू असतं. बरं, त्याच बरोबर इतर पुरोहितांची दुपारच्या आरतीची पण तयारी चालू असते. एवढ्या सगळ्यात त्यांचे आपसातले विषय पण चालू असतात. पण एकाही पुरोहिताचे मंत्र काही चुकत नाहीत.

ह्यावेळेला गेलो होतो, तेव्हा देवळाला रंग देण्याचं काम चालू होतं. एकीकडे विविध पूजांचे मंत्र, दुसरीकडे पुरोहितांचे रंग-काम करणाऱ्या लोकांना सुचना आणि रंग-काम मजुरांची आपसात बडबड, हे सगळं स्वतंत्र रित्या चालू होतं. आणि महाजन वर्ग, एखाद्या आज्ञाकारक पण कंटाळलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे एकीकडे पुरोहितांचे मंत्र आणि सुचना ऐकत होते आणि दुसरीकडे रंग काम बघत होते.

एवढं सगळं लिहिण्याचे कारण काय? तर असं की पुरोहितांचा एकाग्रपणा बघून मी थक्क झालो. मला गायत्री मंत्र येतं. अगदी झोपेतून उठवून कोणी म्हणायला सांगितलं तरी मी न चुकता म्हणू शकेन. पण तिकडे माझ्या बरोबर पुरोहितांनी गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली की माझी लय जाते आणि मंत्र चुकतो. मग मी त्यांचं मंत्र ऐकून समाधान मानतो. पण हे सगळे पुरोहित एवढ्या सगळ्या गोंगाटात आपले मंत्र न चुकता म्हणतात. वैदिक शिक्षण पद्धतीचा हा परिणाम आहे का? लालखी/पालखी उत्सवाच्या वेळेस तर शंभर-एक लोकांच्या अखंड घाई गर्दीत ते मंत्र आणि पूजा सांगून पालखीची वाट मोकळी करतात. कोण पालखीचे फोटो काढतय, कोण आपसात गप्पा मारतय, पण त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या ह्या एकाग्रतेला साष्टांग वंदन करावसं वाटतं.
देवळातील एक दिवसSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, डिसेंबर १०, २००८

शिव वडा विक्रेत्यास पत्र

मित्रहो, तुम्ही शिव वडा बद्दल ऐकले असेलच। नसेल तर गूगल वर शोधा नक्की कळेल

तर, शिव वडा विक्रेत्यास प्रेरणा देण्या साठी हे एक पत्र आहे. काल्पनिक आहे, पण वाचकांनी वाचून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

शिव-वडा विक्रेत्यास पत्र**,+

गरम वड्यास आठवावे । जीवित्व तृणवत्‌ मानावें ॥
इहलोकीं परलोकीं रहावें । शिव-वडा रुपें ॥१॥

शिव-वडाचा खप चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला ॥
वडा ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे तोटा ॥२॥

आहे तितुके वडे खपवावें । पुढे आणिक वाढवावें ।
शिव-वडामय करावें । जगा मध्यें ॥३॥

राज्यामधील सकळ लोक । वडा देऊन करावे ग्राहक ॥
लोकांमनी इतर पाक । उपजोचिं नयें ॥४॥

सेनाप्रमुखांचे पाठिंबा देणे । सेनाप्रमुखांचे प्रोत्साहन देणे॥
सेनाप्रमुखांचे उचलून धरणे । शिव-वड्याला ॥५॥

शिव-वड्याची आठवावी चव । शिव-वड्याचा आठवावा ग्राहक-बांधव ॥
शिव-वड्याचा वाढता प्रभाव । भूमंडळी ॥६॥

त्याहून करावे विशेष । तयांसी म्हणावे शिव-वडाधीश ॥
याउपरी विशेष । काय लिहावें ॥७॥


**हे पत्र काल्पनिक असून असं पत्र लिहून कुणाचं मन अथवा भावना दुखवायचा हेतु अजिबात नाही.

+ ह्या पत्राची प्रेरणा समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रातून घेतली आहे.
शिव वडा विक्रेत्यास पत्रSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, सप्टेंबर ३०, २००८

सज्जन कोण?

सज्जन कोण? मानव कोण? तो, जो सुशिक्षित आहे (सुशिक्षित = शाळेत अथवा कॉलेजला गेलेला (ली) )? की तो ज्याला भोवतालची जाण आहे आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीला मान देऊ शकतो? उदाहरणार्थ, मी भा.प्रौ.सं. (मुंबई) (IIT Bombay) च्या छात्रावासात राहतो. आता भा.प्रौ.सं. म्हणजे देशातील विद्वान, विचारवंत मुलं असलेलं ठिकाण. तुम्हाला वाटेल की या ठिकाणी सगळ्यांना नसेल, पण बहुतेक जणांना आपल्या सामाजिक कर्तव्यांची जाणीव असेल. पण, असं तुम्हाला क्वचितच दिसेल. खरं तर ही शर्मेची गोष्ट आहे, पण काय करणार, सत्य आहे.

अगदी सोपं उदाहरण घ्या. छात्रावासाच्या खानावळीत चार वेळेला मुलांना आहार मिळतो (सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा नाष्टा आणि रात्री जेवण). आता छात्रावासातलं जेवण. ते काही घरच्या जेवणासारखं चविष्ट नसणार. पण ते अगदी काही टाकाऊ पण नसतं. खानावळीत किती अन्न वाया जातं (म्हणजे जे अन्न मुलं पूर्ण न खाता टाकून देतात ते) हे मोजण्यासाठी एक यंत्रणा आहे. छात्रावासात रोज सरासरी १२५ किलो अन्न वाया जातं. हे वजन सकाळच्या नाष्ट्या पासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या अन्नाचं वजन आहे. आता मला बरीच जणं सांगतात की ह्या वजनात अंड्याची टरफलं, शेंगाच्या साली, पिळलेल्या लिंबाच्या फोडी, इ. गोष्टींचं वजन पण येतं. मी तर अगदी ते वजन अर्ध्याने कमी करायला तयार आहे. तरीपण, दिवसा गणिक ६०-७० किलो अन्न वाया घालवणे हे कुठल्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे?

बरं जो जेवण टाकतो, त्याला जाब विचारावा, तर तो म्हणतो की जेवण चांगलं झालं नाही म्हणून टाकलं. एकदा झालं, दोनदा झालं, पण रोज काय जेवण एवढं वाईट बनत नाही की ६०-७० किलो वाया जावं. आणि अन्न वाया घालवणारे पण तेच. इतर फार काही वेगळे चेहरे दिसत नाहीत अन्न वाया घालवताना. मग ह्या गोष्टीचा काय अर्थ होतो? की काही ठराविक जणं रोजच्या रोज फार काही कारण नसताना अन्न वाया घालवतात. अनेक चमत्कारिक कारणं ऐकायला मिळतात. एकाने विचारलं की मी जर हे अन्न वाया नाही घालवलं तर काही फायदा होणार आहे का? अरे बाबा, तू जेवणाचे पैसे देतोस, ह्याचा अर्थ असा नाही की तू अन्न वाया घालवू शकतोस. तुला पाहिजे तेवढे जेवण्यास तू मोकळा आहेस. ते स्वातंत्र्य तुझ्या कडून हिरावलेले नाही. मग अन्न वाया घालवण्याची वेळ का येते?

अजून एक कारण असं ऐकायला मिळतं की मुलांना पुन्हा-पुन्हा बॅन-मेरी पाशी जाऊन वाढून घ्यायचा कंटाळा येतो, म्हणून आधीच जास्त वाढून घेतात आणि मग टाकतात. रोज जेउन सुद्धा ह्यांना आपल्या जेवणाचा अंदाज येत नाही? आपण कुठली गोष्ट किती खाऊ शकतो हे कळायला किती दिवस लागतात? आता ही मुलं भारतातल्या एका अग्रमानांकित प्रौद्योगिकी संस्थेतली आहेत. इथल्या मुलांना कौतुकाने "क्रीम ऑफ द नेशन" म्हणून संबोधलं जातं. इथल्या अभियंतांकडून भारताचं तंत्रज्ञान विकसित व्हावं अशी अपेक्षा आहे. ज्यांना आपल्या जेवणाचा अंदाज येत नाही त्यांना तंत्रज्ञान विकास कितपत जमणार?

हाच आहे का आपला सुसंस्कृत समाज? आपल्या भोवताली मुलं कुपोषणाने मरत आहेत, असं असताना, इथे मात्र ६०-७० किलो अन्न दिवसाला वाया घालवायचं आणि वर तोंड करून ते कृत्य कसं चुकीचं नाही आहे अशी विधानं करायची. हीच का आपली संस्कृती? पैसे देऊन मोकळं झालं की वाट्टेल तसं वागयचं आणि आपल्या जवाबदारीचं अजिबात भान नाही ठेवायचं. ह्या चंगळवादाच्या नाही त्या सवयी लागल्या की काय होतं हे वेगळ्याने सांगायची गरज नाहीये. पण एक सुजलाम-सुफलाम भारत पहायचा असेल तर आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. अन्न मिळणे हा जसा आपला हक्क आहे, तसचं ते वाया न घालवणे ही आपली जवाबदारी आहे. आणि जवाबदारीची जाणीव असली की एक आदर्श समाज घडवायला कितीसा वेळ लागणार?
सज्जन कोण?SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, जुलै १४, २००८

पावले चालली अमेरीकेच्या दिशेने

७ ऑगस्ट. हर्षद अमेरीकेला जाणार. महीना पण उरला नाही. पु.लं. चं "अपूर्वाई" कथाकथन आठवलं. हल्ली घरी तशीच परिस्तिथी असते. हे घेतलं का, ते घेतलं का? विमान कंपनीने किती वजन नेण्याची सूट दिली आहे? प्रत्येक वस्तू घेताना, ह्या वस्तूचं किती वजन भरतय असा प्रश्न पडणे आणि विचारणे. गेले दोन महीने ठळक खरेदी झाल्यावर (म्हणजे कपडे, चादरी, पांघरूणं, जेवण बनवण्याची उपकरणं, इ.) आता मजल किरकोळ खरेदी (साबण, पावडर, बूट, बूट-पॉलीश, इ.) पर्यंत पोहोचली आहे, किंबहुना ती पण संपली आहे. आता बाकीच्या गोष्टींची जुळवा-जुळव चालू आहे.
पर्वाच त्याच्याशी फोनवर बोललो. आता त्याला तिथे जाण्याचे वेध लागल्याचे जाणवले. इथून किती डॉलर न्यायचे, कुठला फोन घ्यायचा, प्री-लोडेड कार्ड घ्यायचं की नेहमीचं डेबीट कार्ड न्यायचं? अशा प्रश्नांची उत्तरं मिळवणे चालू आहे. त्याच्याशी बोलताना जाणवलं की आता हा महीन्याभरानंतर जे उड्डाण भरणार, ते थेट आम्हाला दोन वर्षांनी भेटणार. हर्षद, जो एक फोन केल्यावर मला स्टेशनवर घ्यायला यायचा, सकाळी सातच्या डेक्कनला काहीही कुर-कुर न करता यायचा. माझ्या बरोबर वैशालीला, दुर्गाला, सकाळी वेताळ टेकडीवर फिरायला येणारा, सोसायटी मधल्या नवीन घडा-मोडी सांगणारा, आता दोन वर्षं मला भेटणार नाही! आईशी बोलताना हे सगळं आठवलं (आणि थोडं आता लिहीताना).
पाखरं मोठी झाली, दाण्याच्या शोधात निघाली! हर्षद पण मोठा झाल्याचं जाणवायला लागलं. प्रत्येक बाबतीत खर्चं करताना, हे पैसे आपले नसून आपल्या आई-वडीलांचे आहेत, हा विचार करूनच तो ठरवतो. अमेरीकेत स्वत:चा उदर-निर्वाह चालू ठेवण्यासाठी त्याची धडपड चालू आहे. आई-वडीलां कडून पैसे न मागवता आपला अभ्यास पूर्ण करायची त्याची जिद्द बघून थक्क व्ह्यायला होतं. अर्थात सुरवातीच्या एक-दोन महीन्यांपुरता त्याला जे पैसे लागणार, ते आई-बाबा देतीलच. त्याची ही धडपड पाहून मनात एकच इच्छा निर्माण होते- हर्षद, यशस्वी भव!!
पावले चालली अमेरीकेच्या दिशेनेSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, जून १९, २००८

गो मुंबई कार्डाचे सत्य

मुंबईच्या बेस्ट उपक्रमाने आणि पश्चिम मध्य उपनगरीय रेल्वेंनी प्रवाशांच्या सोई साठी एक अभिनव योजना जाहिर केली . ह्या योजने अंतर्गत एक pre-paid कार्ड खरेदी करून ते एकच कार्ड रेल्वे अथवा बसचं टिकिट काढण्यासाठी वापरता येतं . ह्या कार्डाला "गो-मुंबई कार्ड" असे नाव देण्यात आले. वृत्तपत्रांमधे ह्या कर्डाची खूप प्रसिद्धी करण्यात आली. ह्या कार्डामुळे मुंबईकरांना प्रवास किती सोयीचा होईल हे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे तिकिटाच्या रांगेची कटकट मिटणार होती. आणि त्या शिवाय बस मधे टिकिट काढताना सुटे पैशे बाळगायची गरज उरणार नव्हती. रेल्वेचा प्रवास सुरु करताना सुरवातीच्या स्टेशनला असलेल्या स्मार्ट कार्ड रीडर समोर आपले कार्ड धरायाचे . गंताव्याला पोहचल्यावर तिथून बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या स्टेशन वरच्या स्मार्ट कार्ड समोर धरायाचे. असं केल्यावर आपल्या कार्डातून प्रवास भाड्याची कपात होते. तसेच बसने प्रवास करताना कंडक्टरला आपले गंतव्य सांगितले की तो तेवढे भाड़े आपल्या कार्डातून वजा करणार.

वृत्तपत्रांमधे ह्या कर्डाची खूप प्रसिद्धी करण्यात आली. दादर सारख्या मोठ्या स्टेशनवर ह्या कार्डाची जाहिरात करायला लोकं नेमली. ह्या लोकांनी पत्रकं वाटून प्रवाशांना "गो मुंबई" कार्डा बद्दल माहिती दिली. ह्या कर्डाची प्रसिद्धी फक्त रेल्वे करताना दिसत होती. बेस्ट वाले असलं काही करताना दिसत नव्हते. तरी ह्या कार्डाचे फायदे वाचून मी ते घ्यायचे ठरवले. त्या प्रमाणे बेस्टच्या एका केंद्रावर गेले असता तिथे कळाले की सध्या हे कार्ड फक्त मध्य रेल्वेवर चालतं. पश्चिम रेल्वेने अजून स्मार्ट कार्ड रीडर बसवलेच नाहीयेत. ते बसवायला अजून एक-दोन महीने जातील. शिवाय हे कार्ड बेस्ट मधे फक्त एका मार्गावर वापरता येतं. थोडक्यात म्हणजे, ते कार्ड फक्त पास म्हणून उपयोगी पडतं. ह्या कार्डाचा बेस्ट मधे टिकिट काढण्यासाठी केव्हा पासून उपयोग करता येईल हे बेस्ट मधल्या लोकांना सुद्धा माहित नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी अजून बराच अवकाश आहे.
गो मुंबई कार्डाचे सत्यSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मे १९, २००८

दाटला चोहीकडे अंधार

संशोधनाचे सुरुवातीचे दिवस मोठे मजेत गेले. नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टीं मागचं विज्ञान जाणून घेतल्यावर ते शोध ज्यांनी लावले, त्यांच्या बुद्धी बद्दल एक वेगळाच आदर वाटायचा. म्हणजे अजूनही वाटतो. पण संशोधन कार्यात, केवळ हे सगळं करून चालत नाही. सगळा आधीचा इतिहास वाचल्यावर त्याचा उपयोग कुठे करता येतो का, हे दाखवायचे असते. किंवा त्याचा वापर करून त्यापेक्षा चांगला सिद्धान्त मांडायचा असतो. आपल्या बुद्धीची खरी कस तिथे असते. ह्या कामात केवळ बुद्धी असून चालत नाही. त्याबरोबर ढिगाने संयम लागतो.


कारण, आहे ती सगळी प्रगती लोकांच्या प्रचंड अनुभवातून झालेली असते. ते सर्व अनुभव एक-दीड वर्षात स्वत: समजून मग त्यातील उणे काय आहेत हे काढून, किंवा ह्या क्षेत्रात अजून काय करता येईल हे सांगता येणे खूप कठीण असते. कधी-कधी आहे ते समजायलाच खूप वेळ लागतो. ते आत्मसात करून मग स्वत: त्यावर विचार करून आपल्या संशोधनासाठी काय करता येईल हे सांगायला अजूनच वेळ जातो. त्यातून आजू-बाजूला इतर लोकांचे काम बघून वाटते की आपण खूपच मागे आहोत. अशा वेळेस मन खूप उदास होते. पुष्कळ वेळा असं वाटतं की संशोधन सोडून द्यावं, आणि दुसरं काहीतरी करावं. पण मग, त्या दुसरं काहीतरी मधे असच होणार नाही, हे कशावरून? आणि संशोधन जरा अजून थोडे दिवस चालू ठेवलं तर मार्ग दिसेल, ही एक भोळी अशा असते मनाला.

ह्या काळात शिक्षणेतर कुठलाही कार्यक्रम हाती घेतला, तरी असं वाटतं की आपण वेळ फुकट घालवतोय. मला छायाचित्रीकरणाची हौस आहे, पण सध्या असं वाटतं की उगाच वेळ घालवतोय. मध्यंतरी पोहण्याचा कॅम्प लावला होता. तिथे जाताना सुद्धा वाटायचं की उगाच चाललोय, ह्यापेक्षा अभ्यास केला तर काहीतरी दिशा सापडेल. मनात सारखा एकच विचार- आपल्याला संशोधनाची दिशा कधी आणि कशी सापडणार? पण अशाने अभ्यास सुद्धा नीट होईना. त्यामुळे अजूनच मन खचत होतं.


पण एके दिवशी विचार केला की सारखं चिंतन करण्यात काही अर्थ नाही. आता आपल्याला रुचेल ते वाचायचं. आणि त्या वाचनातच संशोधनाची दिशा शोधायची. त्यानुसार कामाला सुरुवात केलेली आहे. काम निर्विघ्नपणे करता यावं ह्यासाठी सगळ्या सार्वजनिक कामांतून माघार घेतली. ही कां आता इतरांवर सोपवली. शिक्षणेतर बाकी कामं चालू ठेवली आहेत. तरी एक-दोन अडचणी आहेतच. त्यातून स्वत:च बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत. बघूया त्या प्रयत्नांना यश मिळतं का?
दाटला चोहीकडे अंधारSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मे ०८, २००८

गेली भिती सारी

तसं पोहायला मला लहानपणापासूनच येतं. पण ते पोहणं म्हणजे नुसतं पोहणं होतं. त्याला फार काही तंत्र नव्हतं. नुसतं आपलं तरंगायचं आणि पाण्यात पुढे सरकत रहायचे. त्यामुळे एकतर वेग येत नव्हता आणि दुसरं म्हणजे कधीही पोहून झाल्यावर व्यायाम झाल्या सारखे वाटत नव्हते. म्हणूनच IIT मधे Intermediate camp ची घोषणा झाल्यावर त्यात सहभागी होण्याचं मी आणि स्वानन्द ने निश्चित केले. पहिल्या दिवशी रेड्डी सरांना कॅम्पला येण्या संबंधी विचारले. सर म्हणाले की १ कि.मी. पोहता आले तरच तुम्हाला कॅम्प मधे सहभागी होता येईल. झाली ना पंचाईत! या आधी पोहायचो, पण १ कि.मी.? कधीच नाही. फार तर फार ०.५ कि.मी. पोहलो होतो. आणि ते झाल्यावर खोली वर येऊन आडवा झालो होतो. तरी पण स्वानन्दच्या सांगण्यावरून पाण्यात उतरलो.

आमच्या बरोबर त्या कॅम्पला इयत्ता ३री ते साधारण ७वी ची मुलं होती. ती पोहण्यात इतकी तरबेज होती की मला ओशाळल्या सारखं झालं. मग ठरवलं की आता पीछे हाट नाही. पोहूनच दाखवायचं. रेड्डी सरांना आधी कल्पना दिली की पोहणे सुमार आहे, त्यामुळे थोडं गडबड होऊ शकते. पण सरांनीच मला प्रोत्साहन दिलं. म्हणाले की हरकत नाही. तू जर प्रयत्न केलास तर होईल.

मग काय, उतरलो आणि लागलो पोहायला. हळू-हळू करत धापा टाकत जवळ-जवळ ०.७५ कि.मी. पोहलो. सर म्हणाले चालेल. उद्या पासून यायला हरकत नाही. एक परीक्षा पार झाली! पुढचे १५ दिवस आता खडतर तपश्चर्येचे आहेत. पण अजिबात तंत्र-शुद्ध पोहणे येत नसताना मला एवढे पोहता आले हे पाहून माझा आत्मविश्वास एकदम वाढला. पोहण्या बद्दलची जी माझी भिती होती ती पूर्ण पणे नाहीशी झाली. आता १५ दिवसांनी काय होते ते बघू.

गेली भिती सारीSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मे ०१, २००८

मामलेदाराची मिसळ

परीक्षा संपली!!! नेहमी पेक्षा अवघड गेली. पण ती संपल्याचा आनन्द साजरा करायचा होता. किंबहुना, ती कठीण गेल्याचे दुःख बुडवायचे होते. मग काय, सुशांतशी जी-टॉक वर चॅटींग झाले आणि ठरवले.... तुम्हाला काय वाटते, की गम का साथी रम? नाही.... बरेच दिवस आम्ही ठाण्यातल्या प्रसिद्ध मिसळवाल्या बद्द्ल ऐकत होतो. आणि ते बरेच दिवस तिथे न जाण्याचे एक कारण म्हणजे आम्ही त्याची ख्याती ऐकून घाबरत होतो... आम्हाला असं सांगाण्यात आलं होतं की त्याच्या मिसलीचा पहिला घास घेतल्या पासून नाका-तोंडातून पाणी वहायला सुरवात होते. पण गेल्या सोमवारी अभिजीत, सुशांत आणि मी हिम्मत करून गेलो.

राम-राणा जन्मला ती तळतळीत दुपारची वेळ होती (हा डायलॉग पु.लं.चा आहे, हे ठाऊक आहे मला). आम्ही मजल-दर-मजल करत एकदाचे त्या मामलेदाराच्या मिसळीच्या केन्द्रावर पोहोचलो. तिकडे पार रामच्या शेंडी पासून मारुतीच्या शेपटा पर्यंत रांग (हा पण डायलॉग पु.लं.चा आहे). आम्ही धीर करून रांगेत उभे राहीलो. रांग सांभाळयाला एक माणूस असल्याने मधे घुसणे कुणाला शक्य नव्हते. पाच मिनिटातच बाक-देवता आमच्यावर प्रसन्न झाली. बाकावर आम्ही तिघेही विराजमान होताच क्षणी, ऑर्डर सोडली- ३ मिसळ-पाव आणि ३ ताक. मिसळ आली आणि आम्ही तिच्या कडे २ क्षण नुसते बघत होतो. इतक्या दिवसांची उरात बाळगलेली इच्छा आज पूर्ण होत होती. लाल मिर्चीच्या रंगाने उजळून निघालेली ती तर्री, फरसाणाला पूर्ण पणे आपल्या रंगाचे करून आम्हाला आव्हान देत होती- असेल हिम्मत तर खाऊन दाखव. मग काय, पोटात कावळे ओरडत होतेच. आम्ही पण पावाचा तुकडा मोडला आणि तो तुकडा मिसळीत बुचकळला. पहिला घास.... जरा जपूनच... काय आहे, अगदी सचीन तेंडुलकर सुद्धा मॅग्राचा पहिला बॉल जपूनच खेळतो. त्या मिसळीच्या तिखटपणाची एवढी ख्याती ऐकली होती म्हणून पहिला घास घेताना जरा घाबरलो होतो.

पण पहिला घासा नंतर आम्ही सावरलो. मिसळ एवढी काय तिखट नव्हती. मिसळचं आम्हाला सांगितलेले वर्णन म्हणजे पर्थ टेस्टच्या आधी केलेल्या शॉन टेटच्या वर्णना सारखे होते. त्यानंतर शॉन टेटचा समाचार आपल्या फलंदाजांनी ज्या प्रकारे घेतला, त्याच प्रकारे आम्ही मिसळीचा घेतला. मधे-मधे ताकाचा आस्वाद घेत होतो. पहिली वेळ असल्याने थोडी सावधगिरी बाळगलेली बरी असते.

अखेरचा पावाचा तुकडा मिसळीत बुडवून खाताना आमच्या सगळ्यांच्या मुखावर एक वेगळेच तृप्तीचे भाव होते. इतके दिवसाची इच्छा अखेर पूर्ण झाली होती. तिथून बाहेर पडताना ह्या पंढरीची वारी जमेल तेवढ्या वेळा करायची असे ठरवूनच आम्ही निघालो.

मामलेदाराची मिसळSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, नोव्हेंबर २०, २००७

हिंदू धर्म: माझा एक दृष्टीकोन

कधी आपल्या डोक्यात हा विचार आला आहे का? की हिंदू धर्मात ब्रम्हदेवाची अर्धांगिनी सरस्वती, विष्णुची लक्ष्मी आणि शंकराची पार्वती (शक्ति) का आहेत?

ब्रम्हदेव हे अखंड ब्रम्हांडाचे निर्माते. कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी तिच्या निर्मितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर निर्माण करत्याला सफलते साठी ज्ञानाची साथ गरजेची आहे. तर मग, निर्मात्या देवाला ज्ञानाच्या देवीची साथ नको का? म्हणून ब्रम्हदेवाच्या साथीला विद्येची देवी सरस्वती आहे.

श्री भगवान विष्णु सर्वांचे पालक आहेत. अर्थात ते त्रिलोकाचे पालन व रक्षण करतात. कुठल्याही गोष्टीचं पालन करण्यासाठी नेहमी साधनांची गरज असते. त्या साधनांच्या वापराचा मोल द्यावा लागतो. धन हे साधन मिळवण्याचा एक अतिशय महत्वपूर्ण मार्ग आहे. शिवाय आपले इतर कार्य पाप अथवा पुण्य कमवण्याचे मार्ग आहेत. म्हणून भगवान विष्णुंच्या साथीला धन/साधनांची देवी लक्ष्मी आहे.

श्री इश्वर शंकर हे त्रिलोकातील पाप व पाप्यांना नष्ट करणारे देव आहेत. नाश करण्यासाठी शक्तिची असण्याची गरज असते. आणि नुसती शक्ति नव्हे, तर कणखर पणे उभी रहाणारी शक्ति असावी लागते. म्हणूनच हिमालय-पुत्री पार्वती (अर्थात शक्ति) ही भगवान शंकराची पत्नी आहे.

ह्याहून पुढे जायचे झाले, तर ह्यांना त्रिदेव म्हणून ह्यांचं एकरूप का आहे? ह्याचं कारण असं की संसारात घडवणूक, पालन आणि नाश, ही तिन्ही कार्य एकत्र चालू राहिली पाहिजेत. एक अगदी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर बाग काम करणारा माळी घ्या. हा माळी एखादं रोपटं वाढवताना, त्या रोपटाला खत-पाणी देउन त्याचं पालन करतो. त्या रोपटाच्या कुठल्याही भागाला इजा झाली असेल (किव्हा कीड लागली असेल) तर तो भाग नष्ट करतो आणि उरलेल्या भागाचे रक्षण करतो. ह्या सर्वातूनच तो एक सुंदर बाग निर्माण करतो. ही बाग निर्माण करायला त्याला पालन करण्याचं व कुठल्या गोष्टीचा नाश करायचा, ह्या व अजून अनेक विषयांचं ज्ञान असणे गरजेचं आहे !!
हिंदू धर्म: माझा एक दृष्टीकोनSocialTwist Tell-a-Friend

रविवार, जुलै २२, २००७

पु.ल. तुम्ही महान आहात

लेखाच्या शिर्षका बद्दल कुणाचं दुमत होणार नाही. पण तरीही ह्या लेखाला हेच शिर्षक देणं योग्य वाटलं. आज आम्ही आमच्या एका परीचितां कडे गेलो होतो. बरेच दिवस हे परीचित आम्हाला बोलवत होते. त्यामुळे रविवार साधुन मी आमच्या माता-पितां सोबत त्यांचा कडे गेलो. तर आमचे हे परीचित प्राणी प्रेमी आहेत ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यांचा घरी त्यांनी काय-काय पाळलं आहे! सर्वात जास्त आढळुन येणारा कुत्रा, त्याशिवाय वेगळ्या प्रकारचे मासे आणि एक कासव!! त्यामुळे श्री-विष्णुंच्या पहिल्या दोन अवतारांचं दर्शन झालं.

आता मूळ कोकणातलं आणि तालीम पुण्यातली असल्याने हे सगळं गप्प-पणे बघवलं नाही. ह्या सगळ्या दृश्यावर काही तरी भाष्य केल्या शिवाय आमच्या तिर्थरूपांना रहावलं नाही. खरं तर मलाही माझं मत प्रदर्शन करायचं होतं पण का कुणास ठाउक, मी स्वत:ला रोखून धरलं. तर आमच्या तिर्थरुपांनी (आ. ति.) केलेले प्रश्न आणि आमचे परीचित (आ.प.) ह्यांची उत्तरं हा खेळ बघूया-

संदर्भ: आ.पं. कडचं कासव पाण्यात गटांगळ्या खात होतं आणि श्वास घेण्यासाठी सारखं डोकं वर-खाली करत होतं.
.ति.
: कासव पाण्यात श्वास घेतात की हवेत?
आ.प. : नाही, ते हवेत श्वास घेतात. आपल्या कडची कासवं पाण्यात असतात आणि कधी तरी वर येऊन श्वास घेतात. हा सारखा वर खाली करतो. तरी हा आता छोटा आहे. ह्याला जर मोठ्या टाकीत पहिल्या पासून ठेवलं असतं तर हा अजून मोठा झाला असता. त्याचासाठी आधी एक दगड ठेवला होता पण तो मोठा झाल्यावर त्याच्या अंगात एवढी ताकद आली की तो दगड ढकलुन काचेवर आपटायचा. म्हणून तो दगड काढून टाकला.

संदर्भ: आ.पं. नी मासे पण पाळले आहेत. आ. तिं.ना काही तरी बोलावसं वाटलं (का? असं का वाटलं?) म्हणून त्यांनी आ.पं.कडे मास्यांची विचारपूस चालू केली. आता ते मासे कसे ही असले, कुठूनही आले असले आणि त्यांचं काय होणार, ह्या असल्या गोष्टींनी आ. तिं.ना काहीही फरक पडणार नव्हता. पण मूळ कोकणातलं आणि आयुष्य पुण्यातलं आहे ना! मग, गप्प बसून कसं चालेल?

आ. ति.: मासे झोपतात कसे?

आ.प.: ते steady झाले की समजायचं की ते झोपलेले आहेत. साधारण पणे दुपारच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस ते असे एकदम steady असतात. पण, (त्या मास्यांच्या घोळक्यातल्या एका मास्याकडे बोट दाखवत) ह्याला मी कधीही steady पाहिलेलं नाही. हा टोकदार तोंड असलेला मासा. हा सारखा इकडून तिकडे हिंडत असतो. आणि तो बघा तो फक्त वरच्या भागात फिरतो.

आता तो मासा त्या टाकीत कुठेही फिरो अथवा शेजारच्या कासवाच्या टाकीत उडी मारून कासवाला छळो, मला त्याचं काही सोयर-सुतक नव्हतं. इकडे आ.पं.चं चालूच होतं.

आ.प.: इकडे खालच्या बाजूशी त्याला काही घेणं नसतं. तो खाली येतो ते फक्त ह्या बाकीच्यांना जरा त्रास द्यायला. तो खाली आला की समजायचं ह्याला काही तरी mischief करायची आहे. तो खाली आला की बाकीचे सगळे सावध होतात आणि इकडे-तिकडे पळतात.

अच्छा, तर हे वरच्यांनी खालच्यांना छळणं आणि त्रास देणं हे समस्त प्राणी जमातीत आहे ह्याचा बोध मला प्रथम त्या दिवशी झाला. मला वाटायचं की हे उद्योग फक्त ऑफिसां मधे होतात.

आ.प.: (अजूनही वरच्या छळणाऱ्या मास्या बद्दल सांगताना) तो ना फक्त live food खातो. live food दिलं की त्याचा रंग एकदम मस्त गुलाबी होतो. तरी तो आता एवढाच आहे. मोठ्या टाकीत ठेवलं असतं तर अजून मोठा आणि मस्त झाला असता.

मला एक कळत नव्हतं ह्यांचं कासव, मासे हे सगळे टाकीच्या size प्रमाणे स्वत:चा size ठरवत होते की काय? म्हणजे भिष्म पितामह कसे दिवसाचं नक्षत्र, वेळ, काळ, सुर्याची दिशा बघून आज मरायचं की नाही हे ठरवत होते, तसे हे कासव आणि मास्यांचं मला वाटलं. की टाकी मोठी झाली, तर आपण पण मोठं व्हायचं, टाकी लहान असली की आपण लहान व्हायचं. शेवटी, अंथरूण पाहून पाय पसरणे, ह्यालाच तर म्हणतात ना!

हा संवाद अजून बराच वेळ चालला. सगळा तपशील इथे मांडणं शक्या नाही. पण एकंदरीत वाचकांच्या लक्षात आलं असेल की पाळीव प्राणी, ह्या लेखात पु.लं.नी प्राणी मालकांचे केलेलं वर्णन आणि वर मांडलेला संवाद ह्यात फार काही फरक नाही. एक शेवटचा किस्सा सांगतो, म्हणजे सगळं साम्य लक्षात येईल.

आ.पं. कडे बराच वेळ बसणे झाले. दिवे लागणीची वेळ झाली होती. दिवे लावले सुद्धा होते. आ.पं.चा कुत्रा का कुत्री त्यांचा शेजारी सोफ्यावर लोळत पडलं होतं. आ.पं.नी त्याला अगदी लाडात येऊन विचारलं- "शोनी, गुंडी, झोप आली का तुला? अं, अं?" जणू काही त्या श्वानाचं म्हणनं त्यांना समजत होतं. "झोप आली का तुला? झोप, झोप हं." आता हेच जर आ.पं.च्या दिवट्यांनी केलं असतं (हे म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस, सोफ्यावर लोळत पडले असते) तर त्यांचा कमरेत लाथा पडल्या असत्या आणि आ.पं.नी त्यांना शुभं करोति म्हणायला पिटाळले असते.

पु.लं.नी खरच उत्तम वर्णन केलय. आपण इतर इंग्रजी लेखकां बद्दल बोलतो, की ते बघा कसं एखाद्या विषयाचा कसून अभ्यास करतात आणि त्यातून कहाणी निर्माण करतात. उदाहरणार्थ John Grisham, Arthur Hailey. पण पु.लं.नी आयुष्यात घडणाऱ्या सामान्य गोष्टींना चाणाक्ष नजरेने हेरून त्याचं एक सुंदर कथानक आपल्या समोर मांडलं आहे. पु.ल. तुम्ही खरंच महान आहात!

पु.ल. तुम्ही महान आहातSocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, जून १४, २००७

पहिला पाऊस, पहिलं पोहणं

गेला आठवडा-भर खूप उकडत होतं. अगदी बर्फाच्या लादीवर बसलं तरी घाम फुटत होता. असह्य उकाडा, पंखा लावला तरी घाम येणे, आणि सकाळी-सकाळी खोलीत कुणी तरी आल्यावर, बिछाना ओला का लागतो, या बद्दल त्या आलेल्या माणसाच्या डोक्यात शंका येणे, ही सगळी मुंबईत पाऊस पडण्याची ही चिन्ह आहेत. तर, गेला आठवडा भर हे सगळं होत होतं. पण, पावसाला जणू काही I.T. कंपन्यांचं वारं लागलं होतं. म्हणजे, बहुतांश I.T. वाले कसे बंगलोरला जाऊन थडकतात, तसा तो कर्नाटकला पोहचून तिकडेच थांबला होता. महाराष्ट्राची अवस्था त्याला दिसत नव्हती. पण देशाच्या आर्थिक राजधानीचं आकर्षण त्यालाही फार काळ टाळता आलं नाही. आणि शेवटी एकदाचे मान्सून पावसाचे ढग मुंबईच्या आकाशावर दिसू लागले. पण तरीही म्हाणावं तसा पाऊस पडत नव्हता. सकाळी खिडकीतून बाहेर बघावं तर काळे ढग दिसायचे. वाटायचं की चला, आज पाऊस पडेल. पण नाही. आंघोळ करून आलं की सुर्यदेव आकाशात हजर. सुर्याच्या उदयाने, आमच्या पावसाच्या आशा मावळायच्या.
आज सकाळी वर्तमानपत्रात वाचलं की मुंबईत येत्या २४ तासात मान्सूनचे आगमन होणार असा हवामान खात्याने सांगितले आहे. म्हंटलं, म्हणजे जास्तीत जास्त ४८ तासात पावसाची एक तरी सर यायला हरकत नाही. ह्या आनंदात मी छत्री दप्तरात टाकली (पावसात भिजायला मला आवडतं, पण माझ्या कपड्यांना ते आवडत नाही, म्हणून छत्री बाळगावी लागते) आणि वाचनालयात गेलो. तर रस्त्यात पाऊस लागला. लागला काय, शिंतडला. वाटलं, आज पण पाऊस पडत नाही. पण तसं काही झालं नाही. संध्याकाळी आकाश पुन्हा एकदा दाटून आले. अचानक वाटलं की पोहायला जावं. पावसात पोहायची एक वेगळीच मजा आहे. Cast Away चित्रपट ज्यांनी बघितला आहे, त्यांना पावसात पोहण्याची मजा समजू शकेल. अर्थात, त्यात नायकाची जी अवस्था होते, ती होऊ नये, पण तरी पावसात पोहायची मजा काही औरच आहे.
तरणतालावर पोहोचे पर्यंत पाऊस काही चालू झाला नव्हता. पाण्यात उतरलो आणि पोहायला सुरवात केलीच होती की ढग गडगडायला लागले, आणि जोरात पाऊस चालू झाला. पहिल्या पावसात पोहण्याची मजा निराळीच आहे. दिवसभरात तरणतालातले पाणी गरम झाले होते, त्यामुळे पोहताना पाण्याखाली गेल्यावर कोमट पाणी आणि बाहेर आल्यावर थंड पाण्याचा मारा. पाण्याखाली असताना, पाण्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरीचा आवाज, पाण्यावर आल्यावर तोच आवाज वेगळा ऐकू येणे, हा सगळा अनुभव वेगळाच आहे. शब्दात मांडता येणार नाही अशी भावना निर्माण होते.
पोहणे संपले तरी पाऊस काय थांबायचं नाव काढत नव्हता. बरोबर आहे, पहिला पाऊस आहे, बराच वेळ चालणार. तरणतालावर जाताना छत्री नेली नव्हती. मनसोक्त भिजून (आणि पोहून) झाल्यावर roomवर येताना, पुन्हा एकदा भिजलो. पहिल्या पावसात पोहायची आणि भिजायची माझी इच्छा पुर्ण झाली. छात्रावासात परत आल्यावर वाटेत प्रकल्प भेटला. त्याने मला गरम-गरम चहा पाजला. वा!! गार वातावरण आणि गरम चहा, हे combination म्हणजे जणू स्वर्गच. भिजल्यामुळे तो गरम चहा अजूनच आरामदायक वाटत होता. पहिल्या पावसात भिजायचा कार्यक्रमाचा शेवट, हा कार्यक्रमा प्रमाणेच अत्युत्तम झाला.
पहिला पाऊस, पहिलं पोहणंSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, मे १५, २००७

अर्ज़ किया है

१. शायर हैं हम, शायरी हमारा काम है,
कायल हैं इस फ़न के आप, हमे सुधारना आपका काम है,
करते हैं वादा आपसे, की सुधारेंगे अपनी शायरी,
हमारी कोशिश का यह पहला पैग़ाम है।

२. नहीं कोई पैग़ाम उनका सुबह से,
यह बात सोच रहे हैं हम कितनी देर से,
कुछ खाली लग रहा था दिन, कुछ सूनी लग रही थी शाम,
दिल को फ़िर ख्याल आया, आज दिन गुज़रा है बडे अमन से।

३. न खेलो इस दिल से, यह बहुत नाज़ुक है,
नहीं समझोगे तुम, क्या हाल हमारा है,
न कोई साथी, न कोई सहारा है,
यह बेचारा अकेलेपन का मारा है।

४. गर करना हो सवाल, तो शौक से करो,
हर सवाल का मिलेगा जवाब, यह ख्वाईश ना करो,
कुछ ऐसे होते हैं सवाल, जिनके जवाब नहीं होते,
गर न मिले कोई जवाब, तो हमसे रूठा न करो।

५. ख्वाईश है हमारी, हो दिल-ए-तमन्ना बयां शायरी से,
मगर क्या करें, कुदरत ने नहीं नवाज़ा हमें इस फ़न से,
करते हैं मेहनत हम, चाहते हैं हर रोज़,
आज तो एक अच्छा शेर निकले इस दिल से।

फ़नकार: विनय बावडेकर
अर्ज़ किया हैSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, एप्रिल ३०, २००७

काही फालतू विनोद

१ जपान मधील मराठी शाळेचे नाव काय?
याशिका

२. ह्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव काय?
फुंकून पी

३. अमेरीकेतील कोकणी शाळेचे नाव काय?
शिकागो

४. ह्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत?
तुझ्या आईचा घो

५. रशियातल्या सिनेमाघराच्या doorkeeperचे नाव काय?
उभाकाबसकी

६. अफ्रिकेतील तरण तालाचे नाव काय?
या डुम्बा डुम्बा
काही फालतू विनोदSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, एप्रिल १८, २००७

लता मंगेशकरचा कोकण दौरा

एकदा लता मंगेशकर कोकणात गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी मुंबईहून निघाल्या. सहाजिकच त्यांचा बरोबर समूहगायकही होते. लता ताई पुढच्या गाडीत बसून चालल्या होत्या आणि समूहगायकांची गाडी, त्यांचा मागे होती. अचानक, समूहगायकांची गाडी बंद पडली. लता ताई पण गाडी दुरुस्त होईल म्हणून थांबल्या. पण गाडी दुरुस्त व्हायला वेळ लागणार असल्याने समूहगायकांमधील काही जणं लता ताईंना म्हणाली की तुम्ही पुढे गावात जाउन पोहोचा आणि आराम करा, आम्ही मागून येत आहोत.ठरल्यानुसार लता ताई गावात पोहोचल्या आणि समूहगायक येई पर्यंत आराम करत होत्या.

संध्याकाळी, कार्यक्रमाची वेळ होत आली तरी समूहगायक आले नव्हते. आयोजकांना लता ताईंनी सांगितले की समूहगायक असल्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आयोजक चिंतीत झाले. तेवढ्यात त्यांचातील एक जण म्हणाला की आपल्या गावातल्या नाटक-मंडळीतील समूहगायक ह्यांचा मदतीस पाठवू. आयोजक खूष झाले. लता ताई पण निश्चिंत झाल्या.

ठरल्या प्रमाणे कार्यक्रम चालू झाला. लता ताई आणि गावातले समूहगायक. देवाला नमन करून कार्यक्रम सुरू करायचा, म्हणून लता ताईंनी पहिलं गाणं म्हंटलं-

ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,
मला हे दत्तगुरू दिसले, मला हे दत्तगुरू दिसले

समूहगायक गायला लागले-

हिला गं बाई, दत्तगुरू दिसले,
हिला गं बाई, दत्तगुरू दिसले !!!
लता मंगेशकरचा कोकण दौराSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, मार्च १९, २००७

सूर्यग्रहण पाहिलेला माणूस: म्हणजे मी

काल (म्हणजे १८ मार्चला) संध्याकाळी वर्तमानपत्रात सूर्यग्रहणाची वेळ पाहिली आणि वाटलं की सकाळी सूर्यग्रहण बघावं. कारण अशी संधी पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यग्रहण एकत्र येणे खूप दुर्मिळ असेल. या संधीचा अजून एक फायदा असा की कोणत्याही अतिरिक्त साधनाशिवाय हे ग्रहण बघता येतं. तर ठरल्या प्रमाणे हर्ष आणि मी सकाळी-सकाळी IIT च्या मागच्या टेकडी वर साधारण पणे ६:४५ ला जाऊन पोहोचलो. माझ्याकडे नेहमी प्रमाणे कॅमेरा होताच. उजाडलं होतं, पण सूर्योदय झाला नव्हता. तेवढ्यात दोन-तीन जणं येताना दिसली. ते वर आले तर त्यातला एक आमच्या विभागाचा प्रवीण होता. त्याच्याशी थोडावेळ गप्पा झाल्या.


टेकडी वरून चोहीकडचं दृश्य एकदम छान दिसतं. पुर्वे कडे ठाण्याची खाडी लांबून दिसते. तिथून सूर्य उगवताना मस्त दिसतो. नाहीतर IIT मधे सूर्योदयाचे सुरवातीचे क्षण दिसत नाहीत. सूर्य डोंगराच्या वर आल्यावरच आम्हाला दिसतो. म्हणून ग्रहण बघण्यासाठी टेकडी वर जावं लागलं. तेवढ्यात सूर्य उगवताना दिसला. अर्ध-चंद्रासारखा, आज अर्ध-सूर्य पाहायला मिळाला. सूर्य असा दिसत होता जणू काही आज हनुमानाची सूर्य-फळ खायची इच्छा पूर्ण झाली. सूर्य उघड्या डोळ्यांनी बघेनासा होई पर्यंत थांबायचं ठरलं होतं. सूर्यग्रहणाची त्यामुळे अजून छायाचित्रं काढता आली. ही सकाळ पूर्णपणे ग्रहणमय होती. साधारण पणे ७:१५ वाजता सूर्यप्रकाश प्रखर झाला आणि ग्रहण बघायची विशेष साधनं नसल्यामुळे आम्ही खाली परत यायचं ठरवलं. ग्रहण साधारणपणे ७:४५ला सुटणार होतं.


एकंदरीत अमावस्येची समाप्ती आणि पाडव्याची सुरवात चांगली झाली. कुणाला वाटेल, ग्रहण पाहून कसली वर्षाची सुरवात करायची? यावर माझं म्हणणं असं आहे की हे ग्रहण पाहून देवाला प्रार्थना करा, की देवा, या पुढे जी काही ग्रहणं असतील ती पण या ग्रहणाबरोबर सुटून जाऊ दे आणि येणारं वर्ष निर्विघ्नपणे पार पडू दे. असो, तर आजच्या ह्या ग्रहण-दर्शनाने, मी पण सूर्य(ग्रहण) पाहिलेला माणूस झालो.
सूर्यग्रहण पाहिलेला माणूस: म्हणजे मीSocialTwist Tell-a-Friend

बुधवार, फेब्रुवारी २८, २००७

असं खरंच होतं का?

गेल्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो. पुण्याहून जायचे असल्याने, बसने जाणे भाग होते. गोव्याला जाणारी प्रत्येक बस मधे एखादा हिन्दी चित्रपट दाखवतात. तो आपल्याला बघायचा नसला तरी बघावा लागतो. ह्याच तत्वाला अनुसरून, मी पण चित्रपट बघत होतो. चित्रपटाचे नाव होते 'Risk'. खरंच, प्रेक्षकांना बरीच रिस्क घ्यावी लागली हो हा चित्रपट बघताना. एक तर 'अब तक छप्पन' नंतर त्याच विषयावर छप्पन चित्रपट झाले आहेत. त्यामुळे 'रिस्क' मधे काहीही नाविन्य नसणार हे ठाऊक होते. तरीही इतर काही पर्याय नसल्याने हा चित्रपट बघत होतो.

तर, ह्या चित्रपटात, नायकाची आई, त्याला सकाळी-सकाळी दाढी करते वेळी सांगत असते की तू लवकरात लवकर लग्न कर, कुठलीही सून आण, मी आशिर्वाद द्यायला तयार आहे, वगैरे. एक तर मुळात दाढीची वेळ ह्या असल्या गप्पांसाठी नसते. त्यात नायक इंस्पेकटर असतो. त्यामुळे आधीच उलट्या बुद्धीचा. तरीही तो हे सगळं बोलणं निमूट पणे ऐकून घेत असतो. तर माता-पुत्रांचा हा संवाद चालू असतो आणि शेवटी आईचं बोलणं एकादाचं संपतं. त्या बोलण्याचा एकंदर सूर 'मुलाचं लवकर लग्न लागावं' असा असतो.

लगेच चित्रपट पुढच्या 'सीन'ला जातो आणि तिथे एक नायिका गाताना आणि नाचताना दिसते. एकंदरीत तिच्याकडे पाहून लक्षात येते की ही आपल्या नायकाची नायिका आहे. आणि ते गाणे संपल्यावर तो नायक खरंच तिला फोन करून तिच्याशी यथेच्छ गप्पा मारतो.

हे सगळं पाहिल्यावर असं वाटलं की हे असं आपल्या आयुष्यात घडू शकतं का? म्हणजे, एखाद्याची आई त्याचा कानाशी लग्नाची कुर-कुर करत असताना, दुसरीकडे त्याची होणारी बायको त्यासाठी गाणं म्हणत असेल. कल्पना करा की आपली आई आपलं लग्न व्हावं म्हणून आपल्या कानाशी कुर-कुर करत आहे. त्यावेळी तिला टाळायचं असेल तर सांगायचं की आई, जास्तं कुर-कुर नको करुस. तुझी ही कुर-कुर संपली की कुठेतरी कुणी तरी मुलगी माझ्यासाठी नक्कीच नाचत किंवा गात असेल. त्यामुळे तू फक्त तुझी कुर-कुर संपली की कोण मुलगी नाचत आहे किंवा गात आहे ह्याचावर लक्ष ठेव. तीच तुझी व्हावी सून असेल! त्यावर तुमच्या आईची प्रतिक्रिया काय आहे ती मात्र नक्की कळवा.

ता.क. हा प्रयोग करायची वेळ माझ्यावर अजून आलेली नाही.
असं खरंच होतं का?SocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, फेब्रुवारी १६, २००७

बडीशेप

बहुतेक भारतीय घरांत जेवणानंतर बडीशेप किंवा सुपारी (भाई लोकांना देतात ती नव्हे) खाण्याची एक परंपराच आहे. त्यात बडीशेप अधिक लोकप्रिय आहे. किंबहुना बडीशेप खालल्या शिवाय जेवण संपल्यासारखे वाटत नाही. बडीशेपेचा इतिहास मला फारसा माहीत नाही, पण wikipedia वर जे काही वाचलं त्यावरुन असं लक्षात येतं की भारतात खूप प्राचीन काळापासून बडीशेप मुखवास म्हणून वापरली जाते. आणि सध्या बडीशेपेचे अनेक प्रकार मिळतात. बडीशेपेच्या गोळ्या, ज्या चवीला गोड असतात, पुदीन्याचं कवच असलेली minted बडीशेप, वगैरे-वगैरे.

पण बडीशेप खाण्या मागची माझी कारणे थोडी वेगळीच आहेत. वसतीगृहात जेवण झाल्यावर नेहमीच गोड काहीतरी खावसं वाटायचं. म्हणजे एखादं चॉकलेट वगैरे नेहमी खाल्लं जायचं. ह्या विषयावर एकदा चर्चा झाली असता असं लक्षात आलं की जेवण मुळात तिखट असल्याने आणि कुणालाच तिखट खायची सवय नसल्याने ती तिखटाची चव घालवण्यासाठी गोड खाल्लं जातं. त्यानंतर काही दिवसांनी 'हरीश' नामक हॉटेल मधे जेवणाचा योग आला. हा हरीश वाला आम्हाला देवासारखा आहे. मेस मधे जेवायला चांगलं नसलं की आम्ही त्याचाकडे धाव घेतो. तो शरण आलेल्याला कधीही निराश करत नाही. तर, हरीश मधले जेवण नेहमी प्रमाणे मसालेदार होते. जेवण झाल्यावर, बडीशेप खाल्ली (हरीश मधे साधी बडीशेप मिळते) आणि लक्षात आलं की तिखट/मसालेदारपणाची चव गायब झाली. तेव्हा, अचानक (वीज चमकून म्हणा हवं असेल तर) वाटलं की बडीशेपेचा प्राथमिक उपयोग हा मुखातले सगळे चव काढून टाकण्यासाठी आहे(इंग्रजीत 'neutralising traces of any tastes'). त्यावेळी 'निर्वाण' वगैरे म्हणतात ना, तसं काहीतरी मिळाल्या सारखं वाटलं. मुखवास वगैरे हे तिचे secondary उपयोग आहेत. कारण त्या दिवशी मसालेदार जेवल्यावर काहीही गोड खावसं अथवा प्यावसं वाटलं नाही. तेव्हा पासून ठरवलं, की बडीशेपेचा उपयोग मुखवासासारखा न करता, जिभे वरचे सगळे चव neutralise करण्यासाठी करायचा. तर मंडळी, माझं बडीशेप खाण्या मागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल.

जाता-जाता.... ह्या हल्लीच्या mint-coated, वगैरे बडीशेपांमधे चव neutralise करण्याची क्षमता नाही. ह्या बडीशेपा खाल्ल्यावर अजून खाव्याश्या वाटतात. खरी बडीशेप म्हणजे ती साधी बडीशेप. आपल्या मुखातुन सगळ्या चवी neutralise करते आणि ती सारखी खावीशी पण नाही वाटत.
बडीशेपSocialTwist Tell-a-Friend

सोमवार, डिसेंबर ०४, २००६

स्थलांतर : जीवनाचे अविभाज्य सत्य

स्थलांतर, जीवनाचे एक अविभाज्य सत्य! मानव समाजाची निर्मिती ही नेहमी स्थलांतर करताना घडलेली आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणं दिसतील जिथे समाजाची प्रगती ही त्या किंवा इतर एखाद्या समाजाच्या स्थलांतरामुळे झालेली आहे. उदाहरणार्थ, कृष्ण मथुरा सोडुन द्वारकेस आल्याने यादव वंशाची प्रगती झाली. इतिहासात जरा अजुन पुढच्या काळा कडे बघीतलं तर, मुगल/यवनांच्या आगमनाने काही प्रमाणात चांगलं घडलं आहे. जरी आपण मान्य केलं की हिन्दु धर्माची हानि झाली, हिन्दु सामराज्य नष्ट झाली, तरी इतर आघाड्यांवर झालेली प्रगती आपण मान्य करायलाच हवी. बाबरने भारतात तोफा आणल्या. त्या तोफांनी हिन्दुंचं बरच नुकसान झालं खरं, पण त्याच तोफा शिवाजी महाराजांनी नंतर औरंगजेबा विरुद्ध वापरून स्वराज्याचे रक्षण केले होते.

मुगल काळात संगीत, बांधकाम, इत्यादि क्षेत्रात बरीच प्रगती झाली. हिन्दुस्तानी classical संगीताची मुळं मुगल सामराज्यात सापडतील. मुगल काळातील विविध बांधकामांची आजही चर्चा होते. ताजमहल हे मुगल-कालीन स्थापत्यशास्त्राचे आणि कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे. पण एकंदर मुसलमान राजांच्या काळात वैज्ञानिक विचारांची गती मंदावली. भारतामध्ये विज्ञान, गणित, वैद्यकीय इत्यादि क्षेत्रात खूप प्रगती झाली होती, पण ती मुगल काळात कुठेतरी मागे पडली. कदाचित सामराज्याचा बराच वेळ आणि बरीच माणसे स्वत:च्या संरक्षणात गेले असल्या मुळे असेल, किंव्हा एकंदर त्या काळात मुसलमानांमधे वैज्ञानिक आकलनाची आस्था नसल्याने सुद्धा असेल.

पण, हे चित्र, इंग्रजांच्या राजवटीत बदलू लागलं. अर्थात इंग्रजांचा हेतु स्वत:च्या गरजेसाठी चाकरमान निर्माण करण्याचा होता. पण एकदा का शिक्षण मिळालं की विचार शक्तिला कोणी अडवू शकत नाही. इंग्रजांनी आणलेल्या आंग्ल शिक्षण पद्धतीचा तेव्हा जरी उपयोग झाला नसेल, तरी आज आपण त्याचे फायदे बघतच आहोत. इंग्रजांच्या काळात रामानुजम, जगदीशचंद्र बसु, सी. वी. रमण सारखे गणित, वनस्पतीशास्त्र आणि भौतिकी मधले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ त्या काळात पुढे आले. इंग्रज ह्या देशात स्वत:च्या फायद्यासाठीच आले ह्यात काही दुमत नाही, त्यांनी येथील लोकांचा पण खूप छळ केला, पण त्यांचा शिक्षण पद्धतीने आपल्या विचारांना चालना दिली. शिक्षणाच्या बळावर जग जिंकता येतं, हे जरी आजचं ब्रीद-वाक्य असलं, तरी त्याची पाया-भरणी ही स्वातंत्र्य-पूर्व काळात झाली आहे. तात्पर्य काय, तर एखाद्या समाजामधे इतर समाजाचं, किव्हा आपल्या समाजाचं इतर ठिकाणी स्थलांतर हे फायद्याचं असतं. तो फायदा नजीकच्या काळात कदाचित दिसतही नसेल, पण कुठेतरी तो दडलेला असतो.

हे सगळं मी का लिहीत आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल. कारण आज आपण जिथे-जिथे बघतो, तिथे तथाकथित परप्रांतीयांविरुद्ध नेहमीच ओरडा-आरडा होताना दिसत असतं. अर्थात ह्या परिस्थितीला स्थानिक आणि परप्रांतीय दोघं जवाबदार आहेत. परप्रांतीय लोकं येथिल संस्कृतीत स्वत:ला समाविष्ट करून घ्यायला तयार नसतात. त्यांच्यातल्या बहुतेक सगळ्यांचा मुख्य उद्देश फक्त इथे येऊन पैसे कमवणे एवढच असतं आणि आपल्या सारख्या इतर परप्रांतीयांना त्यांच्या ह्याच उद्देशात मदत करणे. आपण ज्या शहरात राहतो, जे शहर/गाव/देश, आपल्याला उदरनिर्वाह करण्यास समर्थ बनवतात, त्या ठिकाणच्या संस्कृतीशी एकरूप व्हावं असं त्यांना अजिबात वाटत नाही. ते सारखे ह्याच विचारात मग्न असतात की आपण आपल्या गावी किती सुखी होतो, आपण कसे रहात होतो, वगैरे. त्यांना असं कधीही वाटत नाही की ह्या शहराला सुद्धा एक संस्कृती आहे, इथे पण आयुष्य आनंदात घालवता येऊ शकतं. ह्या सगळ्याला कष्ट तर नक्की होणार, कारण शहर नवीन, माणसं नवीन, रहाण्याच्या पद्धती नवीन. पण हे कष्ट घेण्यास खूप कमी जणं तयार असतात. त्यातुन प्रत्येकाला सारखं असं वाटत असतं की आपलं गाव/शहर/देश ह्या सध्याच्या ठिकाणापेक्षा खूप चांगलं आहे आणि इथलं रहाणीमान तेवढं चांगलं नाहीये.

आता स्थानिकही ह्या परप्रांतीयांविरुद्धच्या ओरडा-आरडाला कसे जवाबदार असतात? तर ह्याचं कारण असं की स्थानिकांना आपलं आयुष्य एका ठरलेल्या पद्धतीने जगायची सवय झालेली असते. अनेक वर्ष सम-भाषिक व सम-वैचारिक लोकांमधे घालवल्याने, परप्रांतीयांना स्वत:च्या घोळक्यात समावून घेणं त्यांना कठीण जातं. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो बदल पटकन स्वीकार न करता, त्याच्या विरुद्ध आरडा-ओरडा करतो. बदल जेवढं टाळता येईल तेवढं टाळतो. पण अशाने होणारे बदल काही थांबणार नाहीत. आपले आयुष्य सुकर बनवण्यासाठी कष्ट आणि प्रगती करत रहाणे हा पण मनुष्य स्वभावच आहे, हे विसरून चालणार नाही. ह्या बदलाला जो स्वीकारतो, तोच प्रगती करून स्वत:चं नाव बनवू शकतो.

शेवटी काय, आज आपली जी काही भाषा आहे, संस्कृती आहे, ती सगळी अशा स्थलांतरातूनच घडलेली आहे. पुरातन कालापासून तिचात बदल होत-होत ती आजच्या स्वरूपात आलेली आहे. ह्या संस्कृती मध्ये अनेक गोष्टी समावल्या गेल्या, अनेक काढल्या गेल्या. हा बदल जर कोणीही रोखू शकला नाही, तर ह्या पुढचे बदल रोखणारे आपण कोण? आपण फक्त सावध राहून, चांगल्या गोष्टी समावून घेऊन, वाईट गोष्टींना आपल्या संस्कृती पासुन लांब ठेवण्याचे एकत्रीत प्रयत्न केले पाहीजेत.
स्थलांतर : जीवनाचे अविभाज्य सत्यSocialTwist Tell-a-Friend

मंगळवार, नोव्हेंबर २१, २००६

"आवाज... आवाज": माझा दृष्टीकोन

काही दिवसांपूर्वी पु.लं.चं "आवाज.... आवाज" हा लेख वाचला. अर्थात तो जयवंत दळवींच्या "पु.ल. : एक साठवण" मधे आहे म्हणून. नाहीतर आमच्या पिढीला एवढे जुने लेख वाचायला कुठे मिळणार? असो... लेख वाचता वाचता, मन हळूच जुन्या काळात गेले. जुना म्हणजे त्यावेळेला भारतात संगणक आणायला राजीव गांधींना अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांची परवानगी लागली होती. थोडक्यात काय, मी त्या वेळेला शाळेत जात होतो. कानात लगेच त्या काळचे आवाज घुमू लागले. सकाळी ती चिमण्यांची चिव-चिव, पाववाल्याचा पुंउंउंवांक करणारा हॉर्न, बस-स्टॉप वर गेल्यावर बसचा हॉर्न वाजायची वाट बघणे, वगरे सगळं आठवायला लागलं. या पैकी चिमण्यांची चिव-चिव आणि पाववाल्याचा हॉर्न आयुष्यातुन गायब झाल्यासारखॆ आहे. पुर्वी रिक्षाचे हॉर्न पण पाववाल्याचा हॉर्न सारखे होते, आता रिक्षाचा हॉर्न किररररर करून किर-किर करतो.

काळाच्या रस्त्यावर मन वेगाने धावू लागले. शाळा, कॉलेज पार करत-करत IITला येउन पोहोचले. इथल्या वसतीगृ॒हात पण अनेक आवाजांची सवय लागली होती. उदाहरणार्थ, आमच्या वसतीगृहात परगावुन पालकांचे फोन यायचे, त्यासाठी तीन फोनची सोय होती. रोज संध्याकाळी तिथे फोनपाशी असलेला वॉचमन P.A. system वर घोषणा करायचा- "A-wing room no. 410, external call after two minutes". की मग त्या खोलीत राहणारा, सगळी कामं सोडून फोन घेण्यासाठी पळायचा. हा तो काळ होता, जेव्हा mobile आजच्या सारखे पडीक भावाला उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही मोजक्या जणांकडेच mobile असायचे. इतर जणं रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर घरी फोन करायची किव्हा फोनची वाट बघत असायची. ती पण एक मजा असायची.... आपण फोनची वाट बघत असताना दुसऱ्याचा फोन आल्यावर चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असायचे. ते ही बरोबर आहे. माणूस आपली कामं अर्धवट सोडून आलेला असतो, आणि घरच्यांशी बोलायची उत्सुकता असल्याने अशी क्षणिक निराशा होणे सहाजिक आहे. इथे पु.ल. असते तर त्यांनी एक भन्नाट उपमा दिली असती. पण जाऊदे... ते पु.ल. होते, आम्ही वि.अ. आहोत. वसतीगृहात पाचशेहून अधिक विद्यार्थी, प्रत्येकाच्या फोनची कारणे वेगळी... कुणाला नुसतं बोलायचं असायचं, कुणाला आपल्या यशाचा आनंद घरच्यांबरोबर वाटायचा असतो, कुणाला दु:ख कमीत-कमी बोलुन दाखवाचं असतं. P.A. system वरचा तो आवाज, दिवसातुन एकदा जरी नाही आला, तर चुकल्यासारखं वाटायचं. आपला फोन जरी येणार नसेल, तरी!!

IIT मधलं शिक्षण उरकुन नोकरीला लागलो. एक वर्ष नोकरी केल्यावर IITला परत आलो. सुदैवाने पुर्वीचे वसतीगृह मिळाले. राहायला येउन काही दिवस झाले होते. काही तरी चुकल्या सारखे वाटत होते. लक्षात आले की हल्ली P.A. system वरुन होणाऱ्या घोषणा कमी झाल्या आहेत. मुख्य म्हणजे, तुमचा फोन आलाय, अशी घोषणा कधीच होत नव्हती. असं का व्हावं? लोकांचे पालक एवढे बेफिकिर होणार नाहीत ह्याची खात्री होती. मग घोषणा बंद होण्याचे कारण काय? इथे आधीपासून राहणाऱ्या मित्रांना विचारलं. तेव्हा त्यांनी जे सांगितले, त्यावरुन हा आवाज पण काळाच्या पडद्या आड कायमचा गेला आहे, हे लक्षात आले. ते म्हणाले, हल्ली सगळ्यांकडे mobile असतात, त्यामुळे वसतीगृहाच्या फोन वर कोणाचेही पालक फोन करत नाहीत. त्यामुळे, हल्ली P.A. system वर, वॉचमनचा आवाज बंद झालाय आणि खोल्या-खोल्या मधून mobileच्या विविध प्रकारच्या ringtones ऎकू यायला लागल्या आहेत.

या आठवणीं मधे रमलेलो असताना, मन एकदम भानावर आले. पु.लं.चा लेख संपवून जेवायला गेलो. जेवल्यावर खोलीत आलो. अभ्यास वगरे उरकून झोपायला गेलो... गादीवर पडल्या-पडल्या एक विचार आला... हे जे आवाज आपल्या आयुष्यातुन गेले ते इतरांनी निर्माण केले होते. समजा, आपलाच आवाज गेला, तर काय होइल? छे, कल्पनेने पण मन शहारुन निघाले!! असं झालं तर सगळीच बोंबाबोंब... देवाला म्हंटलं, बाबारे, असं काही होवू देउ नकोस...

पण देवाजीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. काही दिवसातचं तो भयंकर विचार सत्य परिस्तिथीत आला. माझा घसा पूर्ण पणे बसला... एक अक्षर बोलता येत नव्हते. अभिजीत, निखील आणि, स्वानंदच्या सहाय्याने किल्ला लढवीत होतो. आमचे रविवारी दुपारी लागण्याऱ्या मूक-बधिरांच्या बातम्यां सारखे झाले होते. मी इशारे करायचो आणि हे लोकं त्याचं भाषांतर करायचे. देवा, ते तीन दिवस खूप त्रासाचे गेले. मनात बरेच विचार होते, पण सांगता येत नव्ह्ते. अरेरे... पुष्कळ कामं त्यामुळे मागे पडली. चवथ्या दिवशी आवाज आल्यावर, आधी मनसोक्त बोलून घेतले. घरी फोन केला, तिघा मित्रांनी सुटकेच नि:श्वास टाकला, मला पण हायसे वाटले.

काल पुन्हा पु.ल.: एक साठवण पुस्तक हातात घेतले. उरलेलं वाचून काढण्यासाठी. सहज "आवाज.... आवज" ह्या लेखा कडे लक्ष गेले. मनात म्हंटले, एक वेळ इतरांनी निर्माण केलेले आवाज काळाच्या ओघात विलीन झाले तरी चालेल, पण आपला आवाज हा आपल्या बरोबरच कालवश व्हायला पाहिजे. नाहीतर जगणे अजून त्रासदायक आहे.

पु.ल. शेवटी म्हणतात, आयुष्य म्हणजे आवाज, ते संपलं तर शांतताच शांतता. मी त्यात अजून एक जोडू इच्छितो. आयुष्य म्हणजे आपला व इतरांनी निर्माण केलेल्या आवाज. हे दोघं वरण-भाता सारखे आहेत. एका शिवाय दुसऱ्याचा काही उपयोग नाही....
"आवाज... आवाज": माझा दृष्टीकोनSocialTwist Tell-a-Friend